
अमळनेर (प्रतिनिधी) कर्जाचा बोझा व नापिकीला कंटाळून तालुक्यातील लोण खुर्द येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान विजय पाटील (वय ३६) यांच्याकडे साधारण दोन बिघे शेती होती. घरात अठरा विश्व दारिद्र्य असून अत्यल्प शेतीवर प्रपंच भागत नसल्याने बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ९ रोजी दुपारी समाधान पाटील हे घरी नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता लोण खुर्द शिवारातील उमेश पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांची चप्पल आढळून आली. गावातील लोकांनी विहिरीत उतरून त्याचे प्रेत बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोझा वाढला होता. त्याच्यावर खाजगी फायनान्स कंपनी, हात उसनवारी व इतर कर्ज होते व त्यातूनच उद्दिग्न होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.