लोंढवे येथील आबासो एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयचे श्रीनाथ पाटील, ‘खबरीलाल’चे संपादक जितेंद्र ठाकूर यांचा प्रामाणिकपणा
आजही कष्ट आणि प्रामाणिकपणा सचोटीवर खरा असल्याचा आला प्रत्यय
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड येथील शेतकऱ्याचे हरवलेले एक लाख १२ हजार रुपये लोंढवे येथील आबासो बी. एस. पाटील हायस्कूलच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत करून कष्ट आणि प्रामाणिक पणा या दोन्ही गोष्टी आजही सचोटीवर खाऱ्या उतरणार्या असल्याचा प्रत्यय आणून दिला. हरवलेले रक्कम जशीच्या तशी परत मिळाल्याने निशब्द झालेल्या शेतकऱ्याने भरभरून आभार मानून कौतुक केले.
सर्वत्र खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने तालुक्यातील शिरूड येथील शेतकरी बापूराव महाजन यांना ठिबक कंपनीकडे पैसे भरायचे असल्याने त्यांनी पारोळ्याहून काही रक्कम आणून एकत्र एक लाख १२ हजार रुपये मोटरसायकल वर ३ रोजी दुपारी सेंट्रल बँकेजवळून घेऊन जात होते. मात्र पिशवीच्या नाड्या तुटल्याने ती खाली पडली. काही वेळाने लोंढवे येथील आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयचे कर्मचारी श्रीनाथ पाटील तिकडून जात असताना त्यांना पिशवीतुन बाहेर आलेली नोट दिसल्याने त्यांनी पिशवी उचलली. त्यात रक्कम मोठी दिसल्याने त्यांनी लागलीच त्यांचे सहकारी तथा ‘खबरीलाल’ चे संपादक जितेंद्र ठाकूर यांना बोलावून घेतले.
पिशवीवरुण लावला अंदाज…
पैसे असलेले पिशवी ही साधारणपणे ग्रामीण भागात वापरली जाते. त्यामुळे निश्चितच हे पैसे एखाद्या शेतकऱ्याचे असतील असा अंदाज श्रीनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी जितेंद्र ठाकूर यांनी लावला. त्यामुळे ज्याचे पैसे हरवले आहेत, त्यालाच ते प्रामाणिकपणे परत मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यानुसार पडताळणी आणि खात्री झाल्यावरच त्यांनी शिरूड येथील शेतकरी बापूराव महाजन यांना परत केले.
लालची बोड्याचे पैशांसाठी आले पुढे
श्रीनाथ पाटील यांनी पिशवी उचलल्यानंतर त्या पिशवीत पैसे असल्याचे दिसताच त्याठिकाणी एक पती पत्नी उभे होते. त्यांनी माझे पैसे हरवले म्हणून बहाणा सुरू केला. मात्र चाणाक्ष श्रीनाथ पाटील यांनी त्याला लागलीच तुझे किती पैसे होते म्हणून विचारले असता त्याने दहा हजार रुपये सांगितले. पिशवीत पैसे जास्त असल्याने ते भामटे असल्याचे लगेच लक्षात आले.
त्यामुळे त्यांचा डाव ओळखून श्रीनाथ पाटील याने त्याला चल पोलीस स्टेशनला, असे सांगताच दोघे पतीपत्नी तेथून पळाले. त्यानंतर श्रीनाथ पाटील यांनी सहकारी तथा खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर यांना बोलावून घेतले. जवळच सेंट्रल बँक असल्याने कॅशियर दिलीप सोनवणे यांना सांगण्यात आले. घटनेची कुजबुज एकाच्या कानावर जाताच त्याने पण माझे तीन लाख हरवल्याचे सांगू लागला. रकमेची तफावत मुळे दुसऱ्याचाही हेतू लक्षात आला.
पैशांच्या खऱ्या मालकाचा घेतला शोध
पैसे घेण्यासाठी लालची बोड्याचे येत असल्याचे लक्षात आल्यावर पाटील आणि ठाकूर दोघांनी रक्कम आपल्याजवळ ठेवून खरा मालक शोधण्याचे ठरवले. सायंकाळी बापूराव महाजन व प्रा. सुभाष पाटील यांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासू लागले. ठाकूर यांना याची माहिती मिळाल्याने बापूराव महाजन यांना पिशवी कोणती आणि पैसे किती याची माहिती विचारून खात्री केली. त्यांनी पिशवी आणि त्यातील रक्कम बरोबर सांगितल्याने खात्री झाल्यावर त्यांना पैसे परत करण्यात आले.
… आणि प्रामाणिकपणाचा झाला गौरव
जितेंद्र ठाकूर यांची पत्रकारितेतील सचोटी आणि त्यांचे सहकारी श्रीनाथ पाटील यांचा प्रामाणिकपणा पाहून बापूराव महाजन भारावून गेले. तसेच ते लबाडांच्या ढोंगाला बळी न पडता थोडी थोडकी नव्हे तर तब्बल लाखाची रक्कम सुरक्षितपणे सांभाळून ठेवत परत केली म्हणून श्रीनाथ पाटील, जितेंद्र ठाकूर यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी प्रा. सुभाष पाटील, लोकमतचे पत्रकार संजय पाटील,सचिन पाटील, पत्रकार चंद्रकांत काटे ,गौरव पाटील ,राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.