अमळनेर(प्रतिनिधी) गेल्या पाच वर्षांत अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. यामुळेच सर्वसामान्य आणि महिलांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालवा व अवैध धंदे बंद करावेत, अशी तक्रार करून गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करून वॉश आऊट सारखी कडक मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याची मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे केली आहे. तसेच सविस्तर चर्चा केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना आमदार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे वाढले असून लोटगाड्यांवर अवैध दारू खुले आम विक्री होत आहे. काही ठिकाणी सट्टा जुगार अड्डे तर काही ठिकाणी मादक पदार्थ विक्री होत आहेत. गेल्या पाच वर्षात हे गुंड मोठ्या प्रमाणात पोसले गेले आहेत. यामुळेच सर्वसामान्य महिलांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बाजार पट्ट्यात काला पिला सारखे गेम चालवून दिवसाढवळ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक सतत भीती आणि दहशतीच्या वातावरणात वावरत आहेत.
गुंडांना कधीही राजकीय आश्रय मिळणार नाही याची दिली ग्वाही….
शहरात रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास जबरी लूट करण्याचे प्रकार दोन दिवसांत वाढले आहेत. यात पालिकेचे उपमुख्याधिकारी व एक दोन घटना घडल्या आहेत. अशा गुंडांना कधीही राजकीय आश्रय मिळणार नाही. यासाठी शहरात वॉश आऊट सारखी अथवा सर्च ऑपरेशन सारखी मोहीम आखावी यासाठी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय दोन्ही पक्ष पोलिसांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे त्वरित कारवाई करावी अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला रस्त्यावर उतरून व्यापक स्वरूपात आंदोलन उभारावे लागेल याची दखल घ्यावी अशी तक्रार दिली आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
कुऱ्हे खुर्द गावात अद्यापही दारू बंदी नाही,
तरुणांचे मुडदे पडल्यावर येईल काय जाग…?
अमळनेर तालुक्यातील कुर्हे खुर्द गावात तरुणांना गावठी दारूचे व्यसन लागल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत असल्याने १० बचत गटांसह महिलांनी कायमस्वरूपी दारू बंदीची मागणी करीत मोर्चा काढला होता. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस यंत्रणा अद्यापही जागे झालेली नाही. महिला स्वतः पुढे येऊनही यंत्रणा हालत नाही. या दारूमुळे तरुणांचे मुडदे पडल्यावर आणि अनेकांचे कुंकू पुसल्यावर ढिम्म झालेल्या यंत्रणेला जाग येईल का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. खुद्द आमदारालाच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे अवैध धंदे बंद करण्यासाठी तक्रार करावी लागते, हे सर्वात मोठे अमळनेर शहरासह तालुक्याचे दुर्दैव आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.