अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगरी येथे बस फेऱ्या अनियमित असल्याने शाळा महाविद्यालयात उशिरा पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच २२ रोजी पाऊस पडत असताना प्रताप महाविद्यालयाजवळ बस थांबल्या नाहीत म्हणून विद्यार्थ्याना घरी जाण्यासाठी उशीर झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अमळनेर तालुक्यातील डांगरी येथून विद्यार्थी अमळनेर प्रताप महाविद्यालयात ये जा करीत असतात. ग्रामीण भागातील नागरिक देखील बाजाराला येत असतात. बस फेऱ्यांची वेळ सकाळी साडे दहा , दुपारी साडे बारा , सायंकाळी साडे चार व सहा वाजता निश्चित केली आहे. मात्र या फेऱ्या अनियमित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बस वेळेवर सोडण्यात याव्यात अशी मागणी अजय निंबा पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच प्रताप महाविद्यालयाजवळ बस थांबा असताना देखील २२ जुलै रोजी बस थांबल्या नाहीत. पाऊस चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे घरी जाण्यासाठी हाल झाले. तरी आगार व्यवस्थापकांनी बस चालकांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.