आर्थिक संकटावर मार्ग काढण्यासाठी संगणक परिचालक आंदोलनाच्या पवित्र्यात
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीत काम करणारे संगणक परिचालकांचे चार महिन्यांपासून व काही संगणक परिचालकांचे एक वर्षापासून मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यात तालुक्यातील ६० संगणक परिचालकांचा समावेश आहे. मानधनासाठी ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर मागील दहा वर्षांपासून डिजिटल महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संगणक परिचालकांचे कार्य सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना तसेच इतर जनहिताचे कार्य थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते महत्वाचा दुवा आहेत. सुरुवातीला तुटपुंज्या मानधनावर काम करीत असताना सद्यस्थितीत ७ हजार रुपये मानधन मिळत आहे. एका खासगी कंपनीकडे मानधनाचा कंत्राट देण्यात आला आहे. जिल्ह्यात ८६९ संगणक परिचालक कार्यरत आहेत. महागाईच्या काळात मानधनावर काम करीत असताना मागील चार महिन्याचे तर काहींचे मागील वर्षापासून मानधन जमा झाले नाही. प्रशासनाकडून त्याबाबतीत कुठल्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही. उलट नवीन कामांचा ताण संगणक परिचालकांवर लादला जात असल्यामुळे संगणक परिचालक त्रस्त झाले आहेत. मागील २०२१-२२ वित्त वर्ष संपून आता नवीन २०२२-२४ वित्त वर्ष चालू झाले आहे. मात्र तरीही संगणक परिचालकांचे मानधन जमा करण्यात आले नाही. तरी वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देउन मानधन लवकरात लवकर जमा करण्यात यावे अशी मागणी संगणक परीचालकांनी केली आहे.
कंत्राटदारांकडून मानधनासाठी दिरंगाई
संगणक परिचालकांना कंपनीकडून कधीच वेळेवर वेतन देण्यात येत नाही. वारंवार वेतनासाठी आंदोलन करून, निवेदन देऊन देखील कंपनीकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे कंपनीवर कोणाचाच अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. इतर कामाचे बाकी असलेले पैसे पण अद्याप बर्याच ऑपरेटरांना मिळाले नाहीत. कंपनीकडून वेळेवर दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
–अशोक पाटील, तालुकाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना