कवी डॉ. कुणाल पवार लिखित ‘मातीमोल’ आणि ‘फुले आणि मुले’ पुस्तकाचे प्रकाशन
अमळनेर (प्रतिनिधी) कवितेला कवीचे चारित्र्य, हृदय लाभते. त्यामुळेच ती कविता उत्कृष्ठ तरते, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी यांनी केले.
खान्देश साहित्य संघातर्फे अमळनेर येथील रोटरी सभागृहात कवी डॉ. कुणाल पवार लिखित ‘मातीमोल’ व ‘फुले आणि मुले’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. या वेळी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून नॅनो शास्रज्ञ डॉ. एल. ए. पाटील , बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष कवी डॉ. सदाशिव सुर्यवशी, गटशिक्षणाधिकारी एस. पी. चव्हाण, विस्तार अधिकारी वाडिले, विजय लुल्ले यांच्यासह प्रकाशन सोहळ्यास प्रा. अशोक पवार, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत, साहित्य संघाच्या तालुकाध्यक्ष सुनीता पाटील, मनोहर नेरकर, वाल्मिक पाटील, विजय मोरे, मुरलीधर पवार, रत्नाकर पाटील, माधुरी पाटील, अशोक इसे, संजय सोनार, छाया इसे, रामकृष्ण बाविस्कर, दत्तात्रय सोनवणे, भारती पाटील उपस्थित होते. या वेळी सदाशिव सूर्यवंशी, वसुंधरा लांडगे, विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कवी डॉ. कुणाल पवार यांनी केले. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. आभार सुनीता पाटील यांनी मानले.
कविता तुमच्या जगण्याची कक्षा वाढवते ः संजय आवटे
लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे म्हणाले की, सानेगुरुजींची निरागसता कुणालच्या कवितेत आहे. देशाची ख्याती बुलंद करण्याचे काम कवींना, साहित्यिकांना करावे लागते. कविता तुमच्या जगण्याची कक्षा वाढवते. माणसांची कक्षा रुंदावण्याचे काम कवी करतो. विचार खतरनाक असतात असे विचारांच्या मारेकऱ्यांना माहीत असते म्हणून दाभोळकरांचा खून होतो.