मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप आणि विजेत्यांना बक्षीस वितरण
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील साने गुरुजी व मोफत वाचनालय संचलित पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे झालेल्या तीन दिवसीय कार्यशाळेत सामान्य ज्ञान, गीत गायन, वक्तृत्व, प्रश्न मंजुषा या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धामध्ये १२१ मुले, मुलींनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय टाऊन हॉल येथे पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य मा.डॉ.एस. आर. चौधरी हे होते. तर पीएसआय नरसिंग वाघ, वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख, बापू नगावकर, भीमराव जाधव, ईश्वर महाजन, दीपक वाल्हे व एसबीआयचे निवृत्त अधिकारी विजय बोरसे विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यशाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण जयपाल हिरे यांचे हस्ते स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या परीक्षक कामी विजय मोरे, वसुंधरा लांडगे, प्रवीण चौधरी, व्ही एन ब्राह्मणकर, सतीश कांगणे , स्वप्नील वानखेडे, चंदन पाटील व अजिंक्य ब्राह्मणकर यांनी काम पाहिले.लोकमान्य टिळक स्मारक समिती ,पंकज कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर ,सतीश कागणे गुरुदेव ऑर्केस्ट्रा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंग पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय मोरे यांनी केले.
प्रामाणिकपणे काम करत रहा : प्राचार्य डॉ. चौधरी
अध्यक्षीय भाषणात निवृत्त प्राचार्य डॉ. चौधरी म्हणाले की, गरीबीतून माणुस मोठा होतो. प्रामाणिकपणे काम करत रहा, कधीही स्वतः ला कमी लेखू नका.प्रयत्न करत रहाणे, कामात सातत्य ठेवल्यास मनुष्य नक्की यशस्वी होतो.
ज्ञानाची भूक लागली पाहिजे : हिरे
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे साहेब म्हणाले की, परिस्थिती कशीही असो त्यातून मार्ग काढा, त्याग करा, ध्येयवेडे व्हा! हार्ड वर्किंग केल्याशिवाय यश मिळत नाही. ज्ञानाची भूक लागली पाहिजे, जीवनात पुस्तक अभ्यास सातत्य हेच महत्त्वाचे आहे.
स्पर्धा निहाय विजयी विद्यार्थी
वक्तृत्व स्पर्धा : प्रथम- जयेश संजय सोनार अमळनेर, द्वितीय- निर्भय संजय सोनार अमळनेर, तृतीय- कु.कुशल रवींद्र भदाणे.
गीतगायन स्पर्धा : प्रथम- ज्ञानसागर संतोष सूर्यवंशी धरणगाव, द्वितीय- दानेश अरुण सोनार अमळनेर, तृतीय- कु.हर्षदा शांताराम धनगर अमळनेर . सामान्यज्ञान स्पर्धा : प्रथम- वर्षा दशरथ पाटील म्हसले, द्वितीय- सुवर्णा सुदाम देसले दहिवद, तृतीय- शुभम ज्ञानेश्वर पाटील.
यांच्या दातृत्वातून देण्यात आली बक्षिसे
सामान्यज्ञान स्पर्धा कै हरिभाऊ चिंधा पाटील स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती सरला हरिभाऊ पाटील यांच्यातर्फे, वक्तृत्वस्पर्धा विजय जगन्नाथ बोरसे यांच्यातर्फे तर प्रश्नमंजुषा व गीतगायन स्पर्धेची बक्षिसे वाचनालयाच्या संचालक मंडळाच्या दातृत्वातून देण्यात आली.