प्रांताधिकारी सीमा अहिरे यांचे पालक व विद्यार्थ्यांना आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सेतुसुविधा केंद्रातून तातडीच्या नावाने जातीच्या दाखल्यांसाठी २०० ते ५०० रुपये जादा फी देऊ नये, तसेच कोणी मागितल्यास रितसर तक्रार करावी, असे आवाहन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. यामुळे अतिरिक्त उकळणाऱ्या सेसुसिविधा केंद्रातील अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
तालुक्यातील सेतुसुविधा केंद्रातून तातडीच्या नावाने जातीच्या दाखल्यांसाठी २०० ते ५०० रुपये जादा फी आकारली जात असल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या याची दखल घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी सेतुसुविधा चालकांना तंबी दिली असून पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही जादा फि देऊ नये, असे आवाहन केले आहे. कोणत्याही जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यापासून किमान कालावधी १५ ते ३० दिवसांचा लागतो. सध्या सुमारे आठ दिवसात देखील दाखले दिले जात असल्याने बरेच सेतू चालक पालकांची विद्यार्थ्यांची दिशाभूल करून तुम्हाला ताबडतोब दाखला हवा असेल तर जादाची फी द्यावी लागेल असे सांगून २०० ते ५०० रुपये जमा करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजित ठरलेल्या फी प्रमाणेच पैसे द्यावेत जादाची फी दिल्यास संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. नागरिकांनी दाखले तयार झाले की नाही याबाबत १५ दिवसानंतर सेतू चालकाकडे संपर्क साधावा , उपविभागीय कार्यालयात गर्दी करू नये. नोकरी साठी अथवा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तातडीच्या बाबीसाठी टोकन तसेच अंतिम मुदतीचा पुरावा घेऊन समक्ष हजर राहावे, दलालांना मध्यस्थीसाठी पाठवू नये, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.