खान्देशातील नवनियुक्त अधिकाऱ्यांचा केला ‘कर्तृत्वाचा महासन्मान’
अमळनेर (प्रतिनिधी) प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रामाणिक असले पाहिजे, कारण पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, असे प्रतिपादन जेष्ठ विधीतज्ञ तथा पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंचतर्फे “कर्तृत्वाचा महासन्मान” हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ, शिवशाही फाऊंडेशन, प्रताप तत्वज्ञान केंद्र, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, पातोंडा विकास मंच, मारवड विकास मंच, दहिवद विकास मंच, अंबरीष टेकडी विकास मंच, जवखेडा विकास मंच , रणाईचे विकास मंच, शिरुड विकास मंच, डांगर विकास मंच यांनी सहकार्य केले. जळगाव मनपाचे वित्त व लेखाधिकारी कपिल पवार यांनी प्रास्ताविक केले. नोबल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयदीप पाटील व युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. ए. पवार यांनी आभार मानले.
या अधिकाऱ्यांचा केला गौरव
यावेळी यूपीएससी परीक्षेत १८२ रँक मिळविणारे गौरव साळुंखे, ४८४ रँक मिळविणाऱ्या वृष्टी जैन यांच्या वतीने सचिन जैन, एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी तुषार वारुळे यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी दिला तोलामोलाचा सल्ला
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की सत्कारार्थी अधिकाऱ्यांनी कार्यकर्तृत्वाने खुर्चीचा सन्मान वाढवावा , सर्वाना समान न्याय द्यावा , प्रलोभनांना बळी पडू नये ,माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की गुणवंतांचा सत्कार बघून अजून शिकावेसे वाटते , त्यांनी महसूल विभागाच्या उत्पन्न व वेतनावरील खर्चाचा लेखा जोखा मांडला, या कार्यक्रमामुळे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे माजी आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले ,माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी तरुणांचा शत्रू मोबाईल असल्याचे सांगून या भूमीला प्रताप शेठ , सानेगुरुजींचा जागतिक वारसा असल्याचे सांगितले ,माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी अधिकारी आणि राजकीय नेते ही एकाच वाहनांची दोन चाके असून एकमेकांवर अवलंबून असतात असे मत व्यक्त केले.
<span;>