मारवड पोलिस स्टेशनवर लवकरच महिला मोर्चाने घेऊन धडकणार
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील कलाली गावात बऱ्याच दिवसांपासून गावठी व देशी विदेशी दारुची खुलेआम, राजरोसपणे विक्री सुरू आहे. यामुळे गावाची समाज व्यवस्था बिघडली आहे. म्हणून ही दारूची बाटली आडवी करण्यासाठी महिला सरपंचांची धडपड सुरू आहे. पण यासाठी पोलिसांकडून ही ठोस कारवाई होत नसल्याने आता महिला थेट पोलीस ठाण्यावर धडक देणार आहेत.
तालुक्यातील कलाली गावात काही तरूण सकाळी ७ वाजेपासून दारू प्यायला सुरू होतात. त्यामुळे गावात बरेच तरुण व्यसनाधिन झालेले आहेत.बऱ्याच घरांमध्ये पुरुष रोज दारू पिऊन आले की काहीही किरकोळ कारणांवरून, कुरापत काढून आई, पत्नी, मुलं/मुली यांना रोज शिवीगाळ, प्रसंगी मारहाण देखील करतात. तर ग्रामस्थांनी ८ महिन्यापुर्वी मोठेपणा दाखवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. गावातील सक्रिय तरूण बंधूभगिनीनां, सदस्य म्हणून बिनविरोध निवड केली. त्यातून मिना मंगलसिंग सुर्यवंशी यांची सरपंच म्हणून तर विजूताई कोळी यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड केली.पण बिनविरोध निवडीत गावाचा सर्वांगीण विकास व गावात दारूबंदी करणे ह्या दोन मुख्य अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केला. म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी व पिडीत महिला , सर्व ग्रामस्थ यांनी गावात दारूबंदी करण्याची कल्पना मारवड पोस्टेला कळविली. त्यांनीही सुरूवातीस खूपच चांगला प्रतिसाद दिला.
पोलीसांची पाठ फिरल्यावर लगेच दारू विक्री
दारूबंदीसाठी ऑगस्ट महिन्यांपासून सतत पाठपुरावा सुरू आहे. मारवडच्या अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार फोन/मेसेज केल्यावर इतर सर्व कामे सोडून ते लागलीच गावाला पोहचतात. पण पोलीस आल्यावर त्यांच्या हाती ना दारू लागत, ना दारुवाला. म्हणून पोलीस गावात, दारू मिळाली नाही बाबत त्यांची कागदोपत्री नोंदीचीं( भविष्यात त्यांना त्रास होवू नये,स्वतचा बचाव व्हावा या हेतूने) पुर्तता करून घेतात. पण पोलीसांची पाठ फिरल्यावर लगेच जोरात दारू विक्री सुरू होते. ही जादू कशी होते ते कुणास ठाऊक.
सहनशीलता संपल्याने काढणार मोर्चा
बाहेरगावाहून आपल्या गावात आणणाऱ्या इसमास रेडहॅण्ड पकडून मारहाण करणे, मालाची फोडतोड, धक्काबुक्की, इ.सर्व कार्यक्रम गावातल्या चिडलेल्या व पिडीत महिला , आम्ही महीला पदाधिकारी व ग्रामस्थ करू शकतो, पण आम्हाला सर्वांना पोलीस खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या माझ्या पतींनी सक्त सूचना व ताकीद दिलेली आहे की, असला कोणताही प्रकार कोणीही करणार नाही, कोणत्याही परिस्थितीत कोणीही कायदा हातात घेणार नाही. म्हणून सर्व महिला व ग्रामस्थ आजपावेतो शांत आहोत.व याच गोष्टीचा दारू वाले व पोलीस गैरसमज काढताहेत की, आम्ही काहीही करू शकणार नाहीत.परंतू आता आम्हा महिलांचा सहनशीलतेचा अंत होत आहे.मारवड पोलिस सदरचा विषय गांभीर्याने घेत नसल्याने, गावात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. प्रशासनाला जाग यावी,तसेच त्यांच्या इतर कामामुळे (दारूबंदी सारख्या किरकोळ कामासाठी )वेळ मिळत नसेल तर आम्ही महिला पदाधिकारी व पीडित महिलांना दारूवाल्यांवर आमच्या पध्दतीने कारवाई करण्याची परवानगी मिळावी , त्यासाठी जास्तीत जास्त महिला,पुरुष यांनी सर्व कुटुंबीयासह एकत्र एकदोन दिवसांत मारवड पोलिस स्टेशनवर मोर्चाने जायचे आहे. म्हणून आपण सर्वांनी मारवड स्टॅण्ड येथे एकत्र जमायचे.तेथून शांततेत, कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन मोर्च्याने मारवड पोलीस स्टेशनला जायचे आहे. त्यासंबंधी आपल्या काही मार्गदर्शक सुचना, अडचणी , अनुभव असतील,तर लागलीच मेसेज,फोन करा.लागल्यास वैयक्तिक मेसेज केला तरी चालेल.आपल्या सुचना आल्यानंतर लागलीच लवकरात लवकर मोर्चाचे नियोजन करता येईल, असे आवाहन सरपंच मिना मंगलसिंग सुर्यवंशी यांनी केले आहे.