गावावर शोककळा पसरल्याने दसरा सणास देवकाठीचा कार्यक्रम रद्द
अमळनेर (प्रतिनिधी) भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकते तालुक्यातील दहिवद येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी सायंकाळी घडली. गावावर शोककळा पसरल्याने दुसऱ्या दिवशी गावाने दसरा सणही साजरा न करता पारंपरिक देवकाठीचा कार्यक्रम ही रद्द केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दहिवद-अमळनेर रस्त्यावर १४ रोजी सायंकाळी वामन माळी यांच्या शेतसमोर नितीन विठोबा माळी (वय २२) या तरुणाला दुचाकीचालाकाने (क्रमांक एमएच -१८ , बीएस ३७९०) भरधाव येत मागून धडक दिली. यात नितीनच्या डोक्याला मार लागून तो जागीच मृत झाला. सुखदेव मोतीलाल माळी यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात चालकविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुनील पाटील करीत आहेत. अपघातात नीतीनचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. त्यामुळे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने ‛चांगसुलतान’येथून निघणारी ७० ते ८० फुटांची देवकाठीची मिरवणूकही गावाने रद्द केली. तर गावात कोणीही सीमोलोंघन केले नाही.