अमळनेर काँग्रेस कमिटीतर्फे महसूल प्रशासनास दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) सुरुवातीला पावसाची ओढ आणि नंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उत्पन्नातही मोठी घट होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नजर आणेवारी कमी करावी व सरसकट शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अमळनेर काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली असून यासंदर्भात त्यांनी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने यंदा साधारणतः १५ जुलैला पेरणींना सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर पुन्हा १८ ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात झाली व तो सतत कमी जास्त प्रमाणात १६ सप्टेंबर पर्यंत सुहू होता. त्यामुळे पिकांनंवर विविध रोग पडून ज्वारी बाजरी, मका, कापूस पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच अतिपावसामुळे कापसावर लाल्या रोग, बोंड अळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पन्न नगण्यच येणार आहे. या वेळी अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ , किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाकार्याध्यक्ष संभाजी पाटील, जेष्ठ नेते बन्सिलाल भागवत,प्रताप पाटील, प्रा. शाम पवार,सईद तेली, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अलिम मुजावर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, युवक काँग्रेस सचिव मयुर पाटील, युवक काँग्रेस चिटणीस राहुल गिरासे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष राजु भाट, कलवंत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
५२ पैसे नजर आणेवारी कमी करा
तालुक्यात लावलेली ५२ पैसे नजर आणेवारी ही अवास्तव असून ती कमी करावी व सरसकट नुकसान भरपाई अनुदानसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.