अमळनेर पोलिसांनी वेळीच पिस्तूलसह मुसक्या आवळल्याने पुढील अनर्थ टळला
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने बेकायदा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या पुण्याच्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यात तिघे सराईत गुन्हेगार असल्याचे उघडक झाले असून त्यांना अटक केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. तसेच पोलिस ते अमळनेर येथे कोणत्या उद्देशाने आले होते याचा शोध घेत आहेत.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सुनील हटकर , भटुसिह तोमर , रवी पाटील , दीपक माळी, राजेंद्र कोठावदे , विलास बागुल , मधुकर पाटील या पोलीसाना २० रोजी रात्री स्टेट बँकजवळ तैनात करून चारचाकीतून (क्रमांक एम एच १२ टी डी ६७९१) पंकज उर्फ बंटी शंकर भूमकर (वय २५ रा नरेअंबेगाव जि पुणे) , मनोज उर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड (वय २५ रा चिखली जाधववाडी हवेली जि पुणे) , ओंकार प्रकाश नाने (वय २८ रा द्वारका निवास ,इंद्रायणी नगर ,भोसरी , पुणे) , प्रशांत शिवाजी गुरव (वय ३८ रा संत तुकाराम नगर , भोसरी पुणे) या चौघांना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुससह अटक केली होती.
तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न , हद्दपार , दारू विक्री , घरफोडीचे गुन्हे दाखल
चौघांची सखोल चौकशी केली असता पैकी तिघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न , हद्दपार , दारू विक्री , घरफोडी आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही गुन्हेगार टोळी असून पोलिसांनी वेळीच पायबंद घातल्याने पुढील अनर्थ टळला आहे. आरोपीना पारोळा न्यायालयात हजर केले असता न्या पी एन पाटील यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.