अमळनेर (प्रतिनिधी) शहरात करण्यात आलेल्या भुयारी गटारींच्या निकृष्ट कामामुळे शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. पावसाचे पाणी झिरपून खड्डे पडत आहेत. त्यामुळे बाजारात वाहने फसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
पालिकेच्या बांधकाम अधिकार्यांनी लक्ष देऊन रस्ते पूर्ववत करून घ्यावीत आणि भुयारी गटार कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरातील भागवत रस्ता , लाल बाग शॉपिंग , गंगाघाट आदी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर भुयारी गटारीचे काम करण्यात आल्याने रस्त्यांच्या मध्यभागी खोल चाऱ्या करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. चाऱ्या बुजताना त्यावर रोलिंग करून खडीकरण करून परत रोलिंग करून डांबरी करण व काँक्रीटीकरण करणे आवश्यक असतांना फक्त जेसीबी मशीनच्या साहाय्याने खड्डे बुजवले जात आहेत. परिणामी पावसाने माती खोल जाऊन पुन्हा खड्डे पडत आहेत. रस्त्यांवर चिखल होऊन वाहने फसत आहेत. बाजरपेठेत दुकानांचा माल घेऊन येणारी वाहने अवजड असल्याने आधीच गर्दी त्यात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तासंतास फसलेली वाहने काढता येत नसल्याने वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे.