सेंट्रल प्रशासकीय इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा
अमळनेर (प्रतिनिधी) शहारतील विविध शासकीय कार्यालये विखुरलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना आपली कामे करताना भटकंती करावी लागते. यामुळे वेळ वाया जाऊन वेळेवर कोणतेच काम होत नाही. त्यामुळे नागरिकांची कामे एकाच छाताखाली होण्यासाठी सेंट्रल प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच शहराला २४ तास पाणी पुरवठा करता यावा म्हणून ५० लाख रुपयांचे वीजबिल वाचवता येईल, असा मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.
स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती निमित्त माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत विवेकानंद उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी आमदार अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , नगरसेविका अॅड चेतना पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, नगरसेवक मनोज पाटील, श्याम पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी सर्वाना हरित भारतची शपथ दिली. माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की नवीन पाणी पुरवठा योजनांसाठी आमदारांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. ढेकू रोडसाठी २ कोटी मंजूर झाले आहेत आणि या परिसरासाठी नवीन स्मशानभूमी उभारण्यात येईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने दिले. पिंपळे रोडवरील स्वामी विवेकानंद नगरमध्ये नव्याने तयार केलेले सुंदर उद्यान नागरिकांसाठी विवेकानंद जयंतीनिमित्त खुले करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ वंदना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनंत भदाणे यांनी केले. अॅड. यज्ञेश्वर पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास दीपक पाटील, प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत, संजय चौधरी, प्रा. अशोक पाटील, सी. एम. पाटील, डी. एम. पाटील, विलास दोरकर उपस्थित होते.