अनेक झाडे होरपळली, कार्यकर्त्यानी आणि अग्निशामक दलाने विझवली आग
अमळनेर (प्रतिनिधी) काही समाज कंटकांनी ऐतिहासिक अंबर्शी टेकडीला १० व्यांदा आग लावल्याचा कुप्रकार ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता केला. या आगीमुळे टेकडीवरील अनेक झाडे होरपळली गेली. टेकडीच्या कार्यकर्त्यानी आणि अग्निशामक दलाने आटापिटा करून लागलेली आग विझवून झाडे वाचवली.
अमळनेर शहराचे सौंदर्य आणि लहानसे पर्यटन स्थळ असलेली अंबर्शी टेकडी विष्णू भक्त अंबरीश राजाची ध्यान धारणा करण्याचे ठिकाण आणि परंपरेनुसार संत सखाराम महाराज देखील टेकडीवर काल्याचे कीर्तन करतात. म्हणून प्रसिद्ध असलेली निसर्गरम्य अंबर्शी टेकडीवर शहराची पाणीपुरवठा यंत्रणा तर खाली घनकचरा डेपो असून सौंदर्यात भर घालण्यासाठी आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे , तत्कालीन तहसीलदार प्रदीप पाटील व नगरपालिका यांच्या सहकार्याने हजारो झाडे टेकडीवर लावण्यात आली आहेत. टेकडी ग्रुप व सामाजिक कार्यकर्ते त्याचे संगोपन करून पाणी पूरवठा योजनेचे वाया जाणारे पाणी चारी खोदून वळते करून झाडांना दिले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समाज कंटकांकडून तब्बल १० वेळा आग लावली. त्यामुळे प्रत्येक वेळी टेकडी ग्रुपच्या सदस्यांना धावत पळत जावे लागते. हातात मिळेल ते साहित्य पाला पाचोळा घेऊन आग विझवली जाते. पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले जाते ११ रोजी सकाळी ११ वाजता देखील आग लागली टेकडी ग्रुपच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली अग्निशामक दलाचे नितीन खैरनार , मच्छीन्द्र चौधरी , रवींद्र मराठे , गुलाब कोळी आदींनी आग विझवली.
दोषींवर कठोर कारवाई करावी
पर्यावरण संवर्धन व टेकडीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी योग्य ती दखल घेऊन प्रयत्न करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.