प्रहार संघटनचेच्या पाठपुराव्याला आले यश, कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) प्रहार संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर अमळनेर पंचायत समितीने दिव्यांगांचा ५ टक्के निधी ३१ मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यामुळे दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रे सादर करावी असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
अपंग हक्क अधिनियम अंतर्गत शासन आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी खर्च केला जातो. कोवीड-१९ च्या साथीमुळे दिव्यांगाकडे सध्या काम धंदा नसल्याकारणाने हा खर्च लवकरात लवकर करणे अपेक्षित होते. प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.अखेर पंचायत समिती ३१ मार्च अखेरपर्यंत ५ टक्के निधी खर्च करणार आहे आणि तसे लेखी आश्वासनही पंचायत समितीने प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांना दिले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी आपापले कागदपत्र ग्रामसेवक यांच्या कडे जमा करावेत, असे आवाहन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.