५ भाजीपाला व २ फळ विक्रेत्यांसह सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते ७ बाजार भरण्याचे दिले आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) संचारबंदीच्या आदेशानंतरदेखील भाजी बाजारात नागरिकांची गर्दी उसळली. त्यामुळे अतिक्रमित हातगाड्या काढून नगरपरिषदेने भाजीपाला बाजाराचे शहरात १० ठिकाणी विकेंद्रीकरण केले. ५ भाजीपाला व २ फळ विक्रेत्यांसह सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते ७ दरम्यानच बाजार भरण्याचे आदेश दिले आहेत.
तर शहरात नाहक रिकामटेकड्या फिरणार्या तरुण आणि नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत घरी पिटाळून लावले.
राज्यात मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केल्याने मंगळवारी २४ रोजी सकाळी नागरिकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली होती. काही चहा, नाश्ता , पानटपरी चालकांनी संधी साधत आपली दुकाने सुरू केली होती. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तहसीलदार मिलिंद वाघ याना व पोलिसांना सूचना करून गर्दी कमी करण्यास सांगितले. पोलिसांनी कठोर पावले उचलत लालबाग परिसरातील भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या रस्त्यांवरील अतिक्रमित हातगाड्या हटविण्यास सुरुवात केली. रस्त्यावर कोणीच विक्रेता उभे राहणार नाही असे सक्त आदेश दिले. अर्ध्या तासात गर्दी ओसरली.
अमळनेर शहरात असा भरेल भाजीबाजार
तहसीलदारांनी नगरपरिषदेला भाजी विक्रेत्यांचे शहरात विकेंद्रीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी भाजीपाला विक्रेत्यांचे दोन संघटनांचे अध्यक्ष गंगाराम निंबा महाजन व प्रकाश भास्कर महाजन याना आदेश देऊन मुख्य बाजारपेठेत दोन ओटे सोडून , तांबेपुरा आययुडीपी मार्केट दोन ओटे सोडून , हशमजी प्रेमजी मार्केट, ढेकू रोड नारायण मिस्तरी वाडी खुली जागा , पिंपळे रोड बोरसेनगर विठ्ठलनगर खुली जागा , आर. के. नगर खुली जागा , विद्याविहार कॉलनी , भगवा चौक मराठा मंगल कार्यालयाजवळ , पैलाड प्राथमिक शाळा पांढरी , पैलाड पाण्याची टाकी साईबाबा मंदिराजवळ अशा १० ठिकाणी भाजीपाला बाजार ५ भाजीपाला व २ फळ विक्रेत्यांसह सकाळी ८ ते ११ व दुपारी ४ ते ७ भरण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर भाजीपाला विक्री करताना दिसणार नाही अन्यथा नगरपरिषदेस कळवावे असेही आदेशात म्हटले आहे.