माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने जगभरात पाय पसरले आहे. त्यामुळे ही जागतिक आपत्तीच आली आहे. यात लोकांना घरातच बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र यात गरजू, गरीब, मजुर, वृद्धांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना अन्न पुरवण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वस्तूस्थिती मांडली आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जगभरात कोविड-१९ मुळे जागतिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वात गंभीर परिणाम रोजमजुरी करणारे मजूर, वृध्द, महिला व बालक अशा सर्व घटकांवर होत आहे. स्वस्त धान्य दुकानात जरी धान्य असेल तरी ते विकत घेण्यास लागणारे पैसे या गरीब लोकांजवळ असतीलच असे नाही. अंगणवाडीतील पोषण आहार बंद झाल्यामुळे माता आणि बालकांचे किमान पोषण मुल्य खालावले आहे. शाळांमधील मध्यान्न भोजन बंद असल्यामुळे गरीब वंचित कुटुंबाच्या मुलांचा आधार सुद्धा संपला आहे.
अशा करा उपाययोजना
कोरोना (कोविड-१९) या साथीस राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्यानंतर मजूरांची, बालकांची, वृद्ध, महिलांची उपासमारी थांबविण्याची आणि रोगामुळे नव्हे तर कुपोषणामुळे उपासमारीमुळे मृत्यू होऊ नयेत यासाठी सर्व उपासमार होत असणाऱ्या बालकांना पोषण आहार द्यावा. सर्व गरजु गरीबांना/ रोजगार न मिळालेल्या महिलांना अन्न पुरवावे. वृद्ध, निराधार गरजू व्यक्तींना घरपोच पोषण द्यावे, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.