मोहोळ उठवतांना खळवाळीला आग लागली की लावण्यात आली..? सारबेटे गावात चर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे येथे मंगळवारी दुपारी खळवाळीला आग लागून एक मोटारसायकल व दोन पारडू, चारा आणि शेती अवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेचा अग्नीशमन दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तर या आगीत चार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही तरुण मधाचे मोहोळ उठवत असल्याने यावेळी लावलेल्या आगीने आग लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही आग लागली की लावण्यात आली..? अशी गावात चर्चा सुरू आहे.सारबेटे येथे गावाला लागूनच खळवाळी आहे. मंगळवारी दुपारी अचानक या खळवाळी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी धावाधाव करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने अमळनेर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाचे कर्मचारी बंबासह दाखल झाले. यावेळी आनंद झिम्बल,अमजद खान, जब्बार खान, किरण शिंदे, यांनी आग विझवली. तर भगवान पवार, भालचंद्र पाटील, कैलास नामदेव पाटील, विजय लुकडू पाटील यांच्या खळवाळीचे नुकसान झाले. यात एक मोटार सायकल जळून खाक व दोन पारडू ,व चारा जळून खाक झाला आहे.