अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे दिनांक ५ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यात पत्रकार आणि पत्रकारितेची दिशा या विषयावर अहिराणी साहित्य कवी व ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील व साहित्यिक तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच .साहित्य आणि पत्रकारिता याचा सुरेख संगम या कार्यक्रमात पहावयास मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व जिल्हाध्यक्ष विकास महाजन हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे कृष्णा पाटील यांनी खास अहिराणी शैलीतील भाषण करून श्रोत्यांची मने जिंकली. त्याचप्रमाणे पत्रकारिता पत्रकारांनी कशी करावी याची अनेक दाखले दिले. सुभाष पाटील घोडगावकर यांनी आपल्या मनोगतात पत्रकार बांधवांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. समस्त पत्रकार बांधवांना शासनातर्फे पेन्शन मिळावे यासाठी मी फार पूर्वीपासून आग्रही होतो. त्याचा परिणाम म्हणून आज ५२ पत्रकारांना दरमहा अकरा हजार रुपये पेन्शन लागू झालेले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व पत्रकारांना हे पेन्शन मिळावे, अशी माझी अभिलाषा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, मला लहानपणापासून पोलीस आणि पत्रकारांनाविषयी विशेष आकर्षण असून मी त्यांना गुरुस्थानी मानतो. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व उपक्रमांना पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे.
या कार्यक्रमासाठी सहसंघटक बापू चौधरी, सचिव विजय शुक्ल, कोषाध्यक्ष महेश कोठावदे, प्रसिद्धीप्रमुख जयंतलाल वानखेडे, महिला आघाडी प्रमुख ॲड. भारती अग्रवाल, कपिला मुठे, वनश्री अमृतकार, अंजू ढवळे तसेच अरविंद मूठे, ताहा बुकवाला, खदीर सादिक, ऊर्जा मित्र सुनील वाघ आदी सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय तालुकाध्यक्ष मकसूदभाई बोहरी यांनी करून दिला. योगेश पाने यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन ताहा बुकवाला यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पत्रकार बांधवांनाचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन केला गौरव
याप्रसंगी पत्रकार चेतन राजपूत, पत्रकार संजय पाटील, जयेश कुमार काटे, पांडुरंग पाटील , भटू वाणी, जितू ठाकूर, रामदास चव्हाण, ईश्वर महाजन, जयंतीलाल वानखेडे, संजय मरसाळे, अजय भामरे, समाधान मैराळे, सुनिल करंदीकर, प्रा. जयश्री साळुंखे आदी पत्रकार बांधवांना मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार बांधवांनी पाडळसे धरणाबाबत आपली धारदार लेखणी चालवण्याची व्यक्त केली अपेक्षा
या कार्यक्रमात साहित्य आणि पत्रकारिता यांचा सुरेख संगम पहावयास मिळाला दोघेही मान्यवर साहित्य आणि पत्रकार क्षेत्रातील भीष्माचार्य होते त्यामुळे श्रोत्यांना एक आगळी वेगळी साहित्यिक मेजवानी लाभली. अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाडळसे धरण पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. पत्रकार बांधवांनी पाडळसे धरणाबाबत आपली धारदार लेखणी चालवावी व खऱ्या अर्थाने अंमळनेर तालूका सुजलाम सुफलाम करावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.