अमळनेर(खबरीलाल) संस्कार, संस्कृती आणि कविता याचं जवळचं नातं असून मुळात हा साहित्य प्रकार शाश्वत व भेदाच्या पलीकडचा आहे. तुमची आई माझी आई होऊ शकत नाही, माझी आई तुमची आई होऊ शकत नाही. तुमच्या माझ्या आईला वयाच्या मर्यादा आहेत. पण कवितारुपी आईला वयाचं ही बंधन नाही हे सांगताना सातशे वर्षापासून माऊलीचं पसायदान आजही म्हटले जाते, असे सांगत कवितेला नियतीनं अमरत्व बहाल केल्याचे प्रतिपादन कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी केले.
दिनांक २९ डिसेंबर रोजी मराठा सभागृहामध्ये मराठा महिला मंडळाचे आयोजित केलेल्या प्रबोधन समारंभात खान्देश कवी प्रा. आंधळे प्रमुख अतिथी होते. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावण पाटील होते.
प्रा.आंधळे आपल्या व्याख्यानमालेत पुढे म्हणाले की, मराठी वाड:मयात आई इतकं वात्सल्य आणि ममत्व तर कुणी जपलं असेल तर ते कविताच्या वाड:मय प्रकारानं. मी आईच्या उदरात असताना तिने म्हटलेल्या कविता ऐकत ऐकत जन्माला आलो. त्यानंतर पाळण्यात कविता ऐकायला मिळाल्या. पाण्यातून शाळेत गेलो तेथेही कवितेने भरभरून संस्कार दिले. तर थेट प्राध्यापक झाल्यानंतर ती काव्य श्वासासारखं शरीरभर नांदत राहिले. हे सांगताना शेवटच्या श्वासापर्यंत कविता प्रत्येकाच्या घर करून राहते हे सांगताना इयत्ता पहिलीपासून ते एम. ए. पर्यंतच्या कवितांची जणू मुसळधार बरसात त्यांनी आपल्या व्याख्यानात देऊन प्रकरणी हसवून प्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणून उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले.
कवितेने जन्मापासून मृत्यूपर्यंत केलेले संस्कार सांगतांना कवी बहिणाबाई चौधरी, आ.ज्ञा पुराणिक , भा. रा. तांबे, अनंत फंदी, ज्ञानेश्वर, तुकाराम, ग. ह. पाटील, सुरेश भट यासह पारंपरिक लोक कवींच्या कवितांचे अभ्यासपूर्ण संदर्भ आपल्या व्याख्यानातून दिले.
याप्रसंगी पत्रकार तथा देवगांव देवळी हायस्कुलचे शिक्षक ईश्वर महाजन यांना वर्ल्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील व महिला मंडळाच्या सदस्या यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेचे प्रस्ताविक महिला मंडळाचे अध्यक्ष तिलोत्तमा पाटील यांनी केले. भारती पाटील यांनी सूत्रसंचाल केले. रेखा मराठे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शीला पाटील, माधुरी पाटील, पद्मजा पाटील, विजया देसर्डा, लीना पाटील , रागिनी महाले , प्रभा पवार , भारती पाटील, भारती गाला, मनीषा पाटील, सुलोचना वाघ यांनी प्रयत्न केले. यावेळी समारंभात शिक्षिका, प्राध्यापिका, डॉक्टर, गृहिणी, समाजसेविका अशा विविध स्तरावरील गृहिणी उपस्थित होते.