अमळनेर (प्रतिनिधी) खरीप २०१९ हंगामातील परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांचा डोळ्यात आलेले अश्रू पाहून कृषिभूषण’ माजी आमदार साहेबराव पाटील ही गहिवरले आहेत.
म्हणून शासनाने तात्काळ पंचनामे करुन जळगांव जिल्ह्यात “ओला दुष्काळ”जाहीर करावा, अशी तातडीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जळगांव जिल्ह्यातील बहुतांशी भागातील सर्वच शेतकऱ्यांना परतीच्या सततच्या पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवाची पिके पाण्याखाली गेली आहेत.
हाताशी आलेला घास सततच्या पावसाने हिरावून घेतला असल्याने बळीराजाची “ईडा-पिडा” टळेनाशी झाली आहे. संपूर्ण जळगांव जिल्ह्यात वार्षिक सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात परतीचा “पाऊस” लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले असून चिंतेचे सावट आहे, याची शासनाने दखल घ्यावी.
खरीपाची पिके गेली सडून
जिल्ह्यातील बहुतांश भागात सततच्या परतीच्या पावसामुळे खरीपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. ऐन दिवाळीच्या पर्वात “जगाचा पोशिंदा” बळीराजा हवालदिल झालेला आहे. सर्वत्र “दाणादाण” झालेली असून शेतकरी बांधवास “दिलासा” देण्यासाठी युद्ध पातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त जळगांव जिल्ह्यात “ओला दुष्काळ” जाहिर करुन शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आपणासह सर्व नवनिर्वाचित आमदार लोकप्रतिनिधींनी शासनाकडे एकमुखी मागणी करुन न्याय मिळवून द्यावा हि विनंती.