अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातल्याने अखेर मंगरूळ (ता. अमळनेर) येथे शांततेत व सन्मानाने भांडे वाटप करण्यात आले. यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान यापुढे कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी एका दिवशी २५० लाभार्थ्यांना भांडे वाटप करण्यात येणार असून ज्यांची नावे असेल त्यांनीच भांडी घेण्यासाठी उपस्थित राहावे त्याव्यतिरिक्त कुणीही येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत भांडे वाटप कार्यक्रमात गेल्या तीन चार दिवसांपासून मोठा गोंधळ उडून लाभार्थ्यांना भांडे न मिळता खाली हात परतावे लागत होते. तर माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जीवनोपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयश्री पाटील यांनी कामगार कल्याणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. अशा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावर जनजागृती होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांचे सशक्तीकरण आणि सामाजिक सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे, आणि त्याचा थेट लाभ कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा हेतू असल्याचे त्या म्हणाल्या.सन्मानाने भांडे मिळाल्याने सर्वानी आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले.