अमळनेर (प्रतिनिधी) राज्यभरात शालेय विद्यार्थिनींसोबत होणाऱ्या छेडछाडी, फसवणूक व गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अमळनेरमधील अल्फैज उर्दू कन्या शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली आहे.
अलीकडील काळात मुलींना फूस लावून पळविण्याचे, त्रास देण्याचे आणि संभाव्य गंभीर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत. अल्फैज शाळा ही पूर्णपणे मुलींची असल्याने, अशा घटनांपासून सुरक्षिततेसाठी अधिक सजगता आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. भविष्यात दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी तातडीने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीसाठी इम्रान खाटीक, आरिफ पठाण, इमरान शेख, अख्तर अली, राजू टेलर, फिरोज पठाण या नागरिकांनी पुढाकार घेत शाळेच्या मुख्याध्यापिका व संचालक मंडळाशी भेट घेऊन लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवण्याची विनंती केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी योग्य असून प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.