अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराज यात्रोत्सव संपून वीस दिवस उलटून देखील नगरपालिकेने बोरी नदी पात्रात साफसफाई केली नाही. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
खानदेशात प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवास अक्षय तृतीयेपासून सुरुवात होऊन 8 मे रोजी रथोत्सव व 12 मे रोजी पालखी मिरवणूक उत्सव उत्साहात झाला. हा यात्रोत्सव सुमारे महिनाभर चालतो. मात्र यंदा मे महिन्याच्या पंधरवड्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यात्रोत्सवात दुकानदार व पाळणा व्यावसायिकांची तारांबळ उडून लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. त्यानंतर मात्र दहा ते बारा दिवस यात्रोत्सवास उधान आले होते. शाळांना सुट्टी असल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद यात्रोत्सवास मिळत गर्दी वाढली होती. या यात्रोत्सवात पाळणे, झुले, दुकाने बोरी नदी पात्रात लावण्यासाठी नगरपरिषदेकडून लाखो रुपयाचा यात्रा कर वसूल करण्यात आला होता. नगरपरिषदेकडून यात्रा उत्सवात भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था तसेच बोरी नदी परिसरात स्वच्छता ठेवण्यात प्राधान्य दिले जाते. तसेच इतर सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातात. मात्र यात्रोत्सव संपून वीस दिवस उलटून देखील बोरी नदी पात्रात कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या सह मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आज देखील नदीपात्रात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या अस्वच्छतेमुळे बोरी नदीपत्रातील समाधी मंदिराजवळील परिसराचे विद्रूपीकरण दिसत आहे. नगरपरिषद एकीकडे भारत स्वच्छ अभियानासाठी लाख रुपये खर्च करत असताना मात्र बोरी नदीपत्राची साफसफाई करण्याचा नगरपरिषद विसर पडलेला दिसतो आहे. त्यामुळे नगरपरिषदेने त्वरित बोरी नदी पात्राची साफसफाई करून परिसर स्वच्छ करावा.अशी मागणी वाडी संस्थान परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नदीपात्राची साफसफाई करावी
यात्रोत्सव संपल्यानंतर बोरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, केर- कचरा जमा झालेला आहे. त्यामुळे नदीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित नदीपात्राची साफसफाई करावी.
– नितीन चित्ते, रहिवासी,वाडी परिसर, अमळनेर
प्रत्यक्ष पहाणी करून साफसफाई करणार
प्रत्यक्ष बोरी नदी पात्राची पाहणी करून लगेचच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्यात येईल.
– किरण कंडारे, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, अमळनेर