जळोद परिसरात डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी, भरारी पथकेही गायब

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसापासून जळोद परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधान आले आहे. जेसीबी नदी पात्रात उतरवून माफियांकडून डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असला तरी अधिकाऱ्यांनी गांधारीसारखी पट्टी डोळ्यावर बांधल्याने वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले आहे. भरारी पथकेही जणू गायब झाली आहेत.

तापी नदी पात्रात या माफियांनी वाळूचे ढीग करून ठेवले असून नदीपात्रात मोठमोठे खड्डे केले आहेत. जळोद अमळगाव मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणारे राजरोसपणे डंपर आणि जेसीबीचा वापर करत आहेत. गाव-खेड्यांमधून असलेल्या मुख्य रस्त्यावर डंपर भरधाव व सुसाट वेगात सुरू आहेत. वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागत आहे. वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेने चुप्पी साधल्याने प्रशासनाच्या तोंडांत अर्थपूर्ण बोळा कोंबला आहे का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. स्थानिक अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या या तस्करांना आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

 

पथकांना डंपरही दिसेनासे झाले

 

वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला ही पथके ग्रामीण भागात रात्री अपरात्री फिरून ट्रॅक्टरवर लक्ष ठेवत होती. काही ठिकाणी कारवाई ही करत होती. वाळूच्या टेम्पोवर ही कारवाई करणाऱ्या या पथकाला मात्र वाळू वाहतूक करणारे डंपर दिसेनासे झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *