पोलिसांनी छापा टाकून चौघांना पकडले, ३८ सिलिंडर जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) एचपी आणि भारत गॅसच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून तो गॅस खाजगी वाहनात भरण्याचा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलिंडर जप्त करण्यात आल्याने या दोन्ही कंपनींच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या अवैध गौरख धंद्यामुळे अनेकांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे याला कोण जबाबदार राहणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील खुल्या जागेत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १७ रोजी रात्री पावणे आठ वाजता घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना वाहनात (एमएच ४३, एएन ११७४) इलेक्ट्रिक पंपाद्वारे घरगुती सिलिंडर मध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. या वेळी पोलिसांनी धनंजय प्रभाकर पाटील (वय ४८ रा. श्रीकृष्ण कॉलनी) आणि अमोल सुभाष बोरसे (वय ३७, रा. धार, ता. अमळनेर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या जवळून १ लाख ५० हजार रुपयांची चारचाकी, ८ हजार रुपयांचे भारत गॅस चे ४ सीलबंद सिलिंडर, ११ हजार रुपये किमतीचे भारत गॅस चे ११ खाली सिलिंडर, ३ हजार रुपये किमतीचे एचपी गॅसचे ३ खाली सिलिंडर, २० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व नळ्या जप्त केल्या. त्याचप्रमाणे २२ रोजी दुपारी १२ वाजता पाचपावली मंदिर परिसरात जयदीप ऑटो गॅरेज मागे दोघे तेच उद्योग करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून जयेश संजय साळी (वय २७, रा. शिरूड नाका अमळनेर), चंदन प्रल्हाद साळी (वय ४५, रा. रामेश्वर नगर शिरूड नाका) यांना वाहनात गॅस भरताना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून १४ हजार रुपये किमतीचे ७ भरलेले गॅस सिलिंडर, ६ हजार रुपये किमतीचे भारत गॅसचे खाली सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचे एचपीगॅसचे १० खाली सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप असे एकूण ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, उज्वल म्हसके, नितीन कापडणे यांनी केल्या आहेत.
ऐवढा साठा येतो कोठून..?
एचपी आणि भारत गॅस कंपनीचे तब्बल ३८ गॅस सिलिंडर या दोन्ही कारवाईत जप्त करण्यात आले. यापूर्वी असेच वाहनांमध्ये गॅस भरताना पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी देखील अशा गैरव्यवसायाला कंपनींकडून आणि एजन्सींकडूनच सिलिंडर कसे पुरवले जातात, असा प्रश्न निर्माण होतो. या सिलिंडरांचा वापर हा वाहनात गॅस भरण्यासाठी केला जात असल्याने अनर्थ घडल्यास अनेक निष्पापांचा जीव जाण्याची भिती व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून सर्वसामान्य जनतेला धोक्यात टाकणाऱ्या सर्व जबाबदार संस्था, घटक यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.