अमळनेर (प्रतिनिधी) मुंदडा नगरमध्ये जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पालिकेची पूर्वपरवानगी न घेता खड्डे खोदणे सुरू केल्याने मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. भर उन्हाळ्यात आफत आल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत.
शहरातील मुंदडा नगर मधून अर्ध्या अमळनेर शहराला पाणी पूरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जाते. याच जलवाहिनीवरून काही पाण्याच्या टाक्या भरल्या जातात. १९ रोजी सकाळी जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पालिकेची पूर्वपरवानगी न घेता खड्डे खोदणे सुरू केल्याने मुख्य जलवाहिनी फुटली. बराच वेळ पाण्याचे कारंजे उडत होते. काही वेळाने ठेकेदाराने ते झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंदडा नगर भागात खोदलेल्या रस्त्यावर अक्षरशः नदी वाहत होती. लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाईपलाईन पूर्ण रिकामी झाली आहे. यापूर्वीही याच भागात खोदकामामुळे पाईप लाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होऊन रस्त्यावर चिखल झाला होता. नागरिकांना १२ ते १५ दिवस पाणी मिळाले नव्हते.
संबंधितवर कारवाई करणार
जिओ कंपनीची केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने आमची परवानगी न घेता खोदकाम केल्याने हा प्रसंग उद्भवला. त्याचे जेसीबी जप्त करण्यात येईल. जर पालिकेची परवानगी घेतली असती तर पालिकेचे अभियंते हजर राहिले असते. भर उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले नसते.
– तुषार नेरकर, मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर.
रात्री उशिरापर्यंत पाईप जोडू
पाईप जोडण्यासाठी साहित्य घेण्यासाठी तातडीने कर्मचारी धुळ्याला रवाना केला आहे. रात्री उशिरापर्यंत पाईप जोडून काँक्रीट टाकून पक्के केले जाईल. मात्र पाणी पुरवठा नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिराने होईल.
– प्रवीण कुमार बैसाणे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग अमळनेर नगरपरिषद
जनतेला वेठीस धरू नये
बेकायदेशीर कामे करणाऱ्या ठेकेदार ,जेसीबी चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अमळनेरच्या जनतेचा संयम सुटत चालला आहे. जनतेला वेठीस धरू नये.
–मनोज शिंगाणे, सामाजिक कार्यकर्ता ,अमळनेर