मंत्री अनिल पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
अमळनेर (प्रतिनिधी) यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे, अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारीना दिल्या आहेत.
याबाबत मंत्री अनिल पाटील यांची अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गौरव उदय पाटील मुडी प्र.डांगरी, रामराव हरचंद पाटील भरवस, गणेश भामरे, विजय लोटन पाटील, जगदीश पाटील बाम्हणे, साहेबराव पाटील एकतास, उदय पाटील, प्रणव पाटील, गुणवंत पाटील मुडी, सोनु संदानशिव सरपंच बोर्दडे, संतोष चौधरी, राजु पाटील, विकास पाटील बोर्दडे, कैलास पाटील सरपंच लोण बु., प्रफुल्ल पाटील एकलहरे, सर्जेराव पाटील खर्दे, सुनिल पवार गलवाडे यांच्या सह कळंबु, भिलाली, शहापूर, तांदळी, मांडळ, भरवस, पाडसे, खेडी, वासरे, लोण ग्रुप गाव येथील ग्रामस्थ मंडळी यांनी भेट घेऊन सद्यस्थिती मांडत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.
पांझरा नदी काठच्या १६ ते १७ गावांच्या गावांना फटका
पत्रात म्हटले आहे की अमळनेर मतदारसंघातील पांझरा नदी काठच्या १६ ते १७ गावांच्या पाणीपुरवठा योजना या पांझरा नदी पात्रात आहेत,पांझरा नदी पात्रात पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी ह्या कोरड्या पडत आहेत,अमळनेर तालुका दुष्काळी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे,तरी अक्कलपाडा धरणातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अश्या सूचना मंत्री पाटील यांनी केल्या आहेत.