अमळनेर(प्रतिनिधी) संपूर्ण कार्यकाळात वादग्रस्त राहिलेले अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एका प्रकरणानंतर बदली झाल्यावरही रजेवर निघून गेले होते. त्यानंतर परत आल्यावर पुन्हा पदभार घेण्याचे स्वप्न पाहत हालचाली करीत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जळगाव कक्षात बोलावून ‘नियंत्रण’ आणले. त्यामुळे अखेर त्यांना फायनली अमळनेर सोडावे लागले. त्यांची अमळनेर येथून अशी झालेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याकडून पुरेशा गुन्ह्यांचा शोध नाही, खोटे गुन्हे दाखल करणे, अवैध धंदे जोरात सुरू ठेवणे, आरोपींशी सलगी , खऱ्या गुन्ह्यात टाळाटाळ करणे, कायदा व सुव्यस्था न हाताळणे , कारवाई करताना भेदभाव करणे आदी तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या. म्हणूनच नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दिघावकर यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांच्या पथकाने तब्बल तीन ते चार वेळा अवैध धंद्यावर छापे मारल्याने पोलिस निरीक्षक मोरे यांची नाचक्की झाली होती. त्यात एका प्रकरणात पुन्हा कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी ठरले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्यासह देश पातळीवर उमटले होते. त्यामुळे पोलीस दलाला मान खाली घालावी लागली होती. अखेर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टाईमुळे पडदा पडला होता. या प्रकरणात सखोल चौकशी करून कर्तव्यात कसुरी , कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून जनहितार्थ जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली होती. मात्र पोलीस निरीक्षक मोरे यांनी सहा पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्याकडे पदभार देऊन रजेवर निघून गेले होते. त्यांच्या पश्चात वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचा पदभार घेतला आहे. तरी देखील रजेवरून परतल्यानन्तर मोरे यांनी पदभार घेण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांपर्यंत ही बाब गेल्यावर त्यांनी मोरे याना तात्काळ नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश दिल्याने मोरे नियंत्रण कक्षात हजर झाले आहेत.