अमळनेर (प्रतिनिधी) अरे, बाप रे.. भूमिपुत्र, स्थानिक काय आहे, हे कालच्या अलोट जनसागराने दाखवून दिले. भूमीपुत्राची मानसिकता काय असते या गर्दीच्या उच्चांका वरून दिसते. रॉ कॉ. चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे सभेच्या स्टेजवर चढतांना अलोट गर्दी पाहून तोंडातून “अरे बाप रे” असे शब्द पडले.
त्यासाठी भूमिपुत्रालाच आमदार होण्यासाठी निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केले. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रात्री येथील ग्लोबल मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उमेदवार अनिल भाईदास पाटील, धरणगावच्या उमेदवार पुष्पाताई महाजन, रवींद्रभैया पाटील, गफारभाई मलिक, जिल्हा बँकेचे संचालिका तिलोत्तमा पाटील, सुभान अली, जयश्री पाटील, योगेश देसले, डॉ अनिल शिंदे, शिवाजी पाटील, गोकुळ बोरसे, सुलोचना पाटील, मनोज पाटील, सचिन पाटील, योजना पाटील, उमेश पाटील आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ….
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. सुशिक्षित तरुणांना बेकार भत्ता देणार आहोत. आमचेच सरकार येणार आहे. १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. राज्याची आर्थिक घडी भाजप सरकारने बिघडवली. शेतीमालाच्या किमती पडल्या. अधोगतीला गेलेले हे सरकार आहे. आम्ही प्रत्येकाच्या हाताला काम देणार आहोत. अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाचा दर्जा देणार. बचत गटांना कर्ज देणार, आरोग्य योजना आणू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. अरूणभाई गुजराथी म्हणाले की, अनिल पाटील या चांगल्या व कर्तबगार मानसाला उमेदवारी दिली आहे. पाडळसरे धरण डोळ्यासमोर ठेवून भाजपला हटवा, असे आवाहन केले.
जाहीर सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी…
भूमिपुत्रासाठी अमळनेर तालुका एकवटला आहे. आतापर्यंत विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत अमळनेर जनता ऐवढ्या संख्येने उपस्थित राहिलेली नव्हती. मात्र भूमिपुत्राच्या जाहीर सभेत उपस्थित राहून नागरिकांनीच विजयाचा संकेत दिला. उत्तर महाराष्ट्र वर झालेला अन्याय हा आता तालुक्यातील जनतेच्या डोक्यात गेला असून त्याची प्रचिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेत पाहायला मिळाली. तालुक्यातील भूमिपुत्रासाठी लोकांनी वज्रमुठ धारण केलेली असल्याचे चित्र दिसून आले . ना भूतो ना भविष्य असा विराट जनसमुदाय आजपर्यंत कधीही जमलेला नसल्याचे प्रत्येक नागरिकाच्या मुखी होते. विराट समुहाने आजूबाजूला असलेल्या सर्व जागेवर आपला ताबा घेतला होता आणि या गर्दीनेचे उपस्थितीचा रेकॉर्ड ब्रेक केला.