अनोरे ग्रामस्थ झाले २४ कोटी लिटर पाण्याचे धनी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात बऱ्याच दिवासांच्या प्रतीक्षेनेनंतर वरून राजाने काल सायंकाळी दमदार हजेरी लावल्याने आमचा कष्टकरी शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे. तर तालुक्यातील अनोरे ग्रामस्थांनी यंदाच्या भर उन्हाळ्यात आंगाचा घाम नितरवून जमिनीत झिरपेपर्यंत श्रमदान केल्याने त्यांच्यावरही वरुनराजा चांगलाच मेहरबान होऊन धो-धो बरसला. यामुळे “वॉटर”कपच्या माध्यमातून खोदलेली तळी आणि नाल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे गावात पाण्याची आबादाणी झाली आहे. त्यामुळेच ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या आनंदालाही पारावारा उरला नाही. ग्रामस्थांचे श्रमदान आणि वरुणराजाच्या मेहरबानीने गावाच्या परिसरात तब्बल २४ कोटी लिटरवर पाण्याचा साठा झाल्याने गाव जलसंपत्तीने श्रीमंत झाल्याने ग्रामस्थांसह तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार ज्योती देवरे यांनी चक्क कंबरेपर्यंत पाण्यात उतरून “काकू सांगा साऱ्या जगाला…! वॉटर कप अनोरे गावाला…!” अशी घोषणा देत आज जलपूजन करून मोठ्या उत्साहात ‘जलोत्सव’ साजरा केला.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून अमळनेर तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी कोसोदूर पायीपीट करून कंबरडे मोडतात. माणसेच पाण्यासाठी कासावीस होत असताना प्राणी, पक्षी अक्षरशः पाण्यासाठी तरफडत होती. पण कालच्या पावसाने दमदार लावलेल्या हजेरीमुळे तालक्यातील काही भागात नाले चांगलेच ओसंडून वाहताना दिसत आहेत.
तर तालुक्यातील अनोरे गावाचा विचार केल्यास गेल्या चार वर्षांपासून ग्रामस्थ दुष्काळाचा सामाना करीत होते. पण त्यांच्या मदतीला धावून आले प्रसिद्ध हिरो अमिर खान याच्या पानी फाऊनडेशनचे शाश्वत काम याला ग्रामस्थांनीही चांगलीच जोड देऊन भर उन्हात घाम गाळून श्रमदान केले. तर शासनाच्या चौकटीत राहून काम न करता श्रमदानासाठी आमदार, माजी आमदार, नगराध्यक्षा, जि.प. सदस्य, प.स.सदस्य, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,पोलिस निरीक्षक,सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावातील नागरिक, महिला, पत्रकार, अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली आणि त्याच्या यशाचे फळ आज दिसू लागले आहे.
पाण्यात उतरणाऱ्या एकमेव तहसीलदार…
एरवी शासकीय अधिकाऱ्यांविषयी नागरिकांचा अनुभव फारसा चांगला नसतो. पण अनोरे ग्रामस्थांनी साजरा केलेल्या जलोत्सवात तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातील अधिकारी पलीकडील व्यक्तीचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. त्यांनी नुसतेच काठावर उभे राहून पूजन न करता चक्क ग्रामस्थांसोबत पाण्यात उतरून जलपूजन केले. त्यामुळेच पावसाच्या या गढूळ पाण्यातही ग्रामस्थांनी त्यांची ‘स्वच्छ प्रतिमा’ अनुभवली. कदाचित पाण्यात उतरून जलपूजन करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव तहसीलदार असतील. त्यांच्या उत्साहने ग्रामस्थांनाही यापुढेही अधिक चांगले काम करण्याचे बळ मिळाले.
अनोरे गाव झाले जलकोट्याधीश..!
प्रत्येक माणूस आज पैशांच्या मागे धावत आहे. पण अनोरेग्रामस्थ पाण्यासाठी धावल्याने त्यांची वनवन थांबणार आहे. पावसामुळे गावातील जुने १९ आणि नवे १४ अशी ३३ शेततळी पाण्याने तुडूंब भरली आहेत. या जलसंधारणाच्या स्त्रोतांमध्ये आज तब्बल २४ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. या जलसंपत्तीने अनोरेकर ग्रामस्थ नक्कीच जलकोट्याधीश झाले आहेत. त्यांचा आदर्श तालुक्यातील अन्य गावांनीही घेतल्यास नक्कीच अमळनेर तालुका दृष्काळाच्या छायेतून बाहेर पडून सुजलाम- सुफलाम होईल, यात कोणाचेही दुमत नाही.
अभिनेता अमिर खान यांच्या पानी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात वॉटर कप स्पर्धा घेतली जात आहे. यात राज्यातील अंतिम १५ गावांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील तीन गावांचा समावेश आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील दोन गावे आहेत. यामध्ये अमळनेर तालुक्यातील अनोरे आणि जामनेर तालुक्यातील चिंचोली गावाचा समावेश आहे. अनोरे गावात पहिल्याच वर्षी तब्बल २४ कोटी लिटर पाणीसाठा झाल्याने हा वॉटर कप आम्हीच जिंकू, असा आत्मविश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.