सत्ताधारी गटात भूकंप विरोधी नगरसेवक देखील हजर..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर काल मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी नगरसेवक गटातून बंडखोर गटाने अचानक नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले. यामुळे पालिकेतील सत्ताधारी गटाला हादरे बसले असून घडामोडींना वेग आला आहे.
शहरात आज पिण्याच्या पाण्याची जी बिकट परिस्थिती झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत आहे. त्याला नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती माजी आमदार साहेबराव पाटील जबाबदार आहेत.यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी मुख्याधिकारी,जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे सत्ताधारी गटातील नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन,कमलबाई पितांबर पाटील, शितल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील,नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार नगरसेवक प्रताप अशोक शिंपी,सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल यांनीं एका निवेदनाद्वारे केली आहे. तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही तर प्रत्येक प्रभागातून भव्य मोर्चा काढण्यात येईल. यावेळी विरोधी गटाचे प्रवीण पाठक, शाम पाटील, व योगराज संदानशीव आदींनी भेट दिली. तर संतप्त नगरसेवक सिंधी कॉलनी भागात जाऊन जीवनधारा या प्रकल्पाला भेट देत त्यांनी मुख्याधिकार्यांना त्याठिकाणी बोलावले होते. याठिकाणी अवैध नळजोडणी दिल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला होता. दरम्यान मुख्याधिकारी यांनी चौकशी केली असून स्थिती काय आहे हे जाणून घेतले आहे.
राजीनामा मागण्याचे निवेनात दिलेली ठळक कारणे
अध्यक्षांना माहीत असुन तिसरे आवर्तन मिळणार नाही तरी दुसरी उपाययोजना केली नाही, पाणी टंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही, पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारी पासुन दोन दिवस वाढवण्यास सांगत होते.त्याचा विचार केला नाही, दुष्काळ असुन पाणीपुरवठा यंत्रणा पुर्णत: कोलमडली असुन १० ते १५ दिवसात पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस नगरपरिषदेत येत नाही. मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजुर करून दिला. जिवनधारा ह्या खाजगी कंपनीला मुख्यवाहिनी वरून कनेक्शन देऊन तेथे ७०% फिल्टर केलेले पाणी वाया जात आहे. वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला. नगरसेवक स्वखर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असुन पालिकेचे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे,नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतांनाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही. उपनगराध्यक्ष सहा सहा महीने ठरल्याप्रमाणे न निवडणूक घेऊन बदलले नाही. आयत्या वेळच्या विषयात अ,ब, क, असे ठराव करून दोन ते तीन कोटीची कामे मंजुर करणे. आजी व माजी आमदारांच्या वैयक्तिक भांडणामुळे विकासकामांवर होणारा परिणाम व नागरिकांचे होणारे नुकसान. वाढीव घरपट्टी ठराव करूनही त्याच्यावर अंमलबजावणी न झाल्यामुळे अमळनेरकरांना वाढीव घरपट्टी भरावी लागली. आयत्या वेळी खोटे ठराव करून न झालेल्या कामांची बिले काढणे. मागच्या वर्षी पावसाळ्यात नगरपरिषदेचा मुरूम खाजगी जागेत साठवून दुसर्या रस्त्यांच्या कामांवर वापरणे. कॉटन मार्केट समोरील शॉपिंग सेंटर मध्ये जास्तीचे पैसे घेऊन पावती कमी देऊन दुकान विकणे, हेंगडेवार शॉपिंग सेंटर मधील दुकानदारांकडून जास्तीचे बांधकाम करून देऊ म्हणू यासाठी स्वत:चा फायदा करून घेतला. नगरसेवकांचे फोन न उचलणे. एलईडी लाईट, फवारणी ट्रॅक्टर, जेसीबी मशीन ई. वस्तु घरात किंवा घराच्या बाजूला स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवणे. माजी आमदारांची इच्छा असेल तर त्या गल्लीमध्ये एका दिवसात रस्ता, स्ट्रीट लाईट, पाईप लाईन ई. सुविधा देतात. नगरसेविकांचे पुत्र व त्यांचे स्वीय सहाय्यक यांना कामे देऊन निष्कृष्ट दर्जाची कामे करणे. अधिकारी व कर्मचार्यांना सक्ती दिली असुन नगरसेवकांचे ऐकायचे नाही. पावसाळ्यात नागरिकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत व त्यावर कोणतीही अंमलबजावणी नाही. शॉपिंग सेंटर मधील राखीव दुकाने जवळच्या माणसाचे ऐकुन फेरफार करून विकुन मलिदा खाणे. विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडे एकही ठराव न पाठवणे. चुकीच्या ठरावांवर सह्या न केल्यास किंवा विरोध केल्यास नगरसेवकांना तुमच्या प्रभागात कामे होऊ देणार नाही असे धमकावणे. बैठक घेण्याअगोदर नगरसेवकांना विश्वासात न घेणे. काही प्रभागात नागरिकांना चालण्यासाठी खडीचे मुरूमचे साधे रस्ते नाहीत आणि काही प्रभागात सिमेंटच्या रस्त्यावर सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहे. अपमानास्पद वागणूक देणे,पाण्याचे नियोजन नाही अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा काही भागात अर्धा तास तर काही भागात 8 ते 10तास पाणी पुरवठा केला जातो. अशी अनेक कारणे देत नगरसेवकांनी खदखद बाहेर काढली आहे.