अमळनेर(प्रतिनिधी) सानेगुरुजींचा पंढरपूर मंंदीर सत्याग्रह, पंढरपूर मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा व ते सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुले व्हावे यासाठी सानेगुरुजी 1 मे रोजी उपोषणाला बसले व 10 मे रोजी उपोषण समाप्त झाले. पंढरपूर मंदीर सर्वांसाठी खुले झाले
या पार्श्वभूमीवर सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठाने किर्तन सप्ताह आयोजित केला त्याची सुरुवात निंभोरा गावातुन झाली.
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर या रे या रे लहान थोर l याती भलते नारी नर ll अशी साद घालून वारकरी संतांनी समतेची वाटचाल सुरू केली. जात, धर्म, पंथ आदी भेद झुगारून माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. साने गुरुजी यांनी दहा दिवस उपोषण करून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश देऊन वारकरी संतांची समतेची वाट अधिक प्रशस्त केली, असे प्रतिपादन ह.भ .प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी निंभोरा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात केले.

वारकरी संतांच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटले आहे, असेही ते म्हणाले.पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी साने गुरुजी यांनी 1 मे ते 10 मे उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना मोठा विरोधही झाला. मात्र त्यांच्या निर्धारा पुढे सर्व व्यवस्था नमल्या आणि अस्पृश्यांना सावळ्या पाडुरंगाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला. या ऐतिहासिक स्मृती गाजविण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या वतीने ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या तीन दिवसीय फिरत्या कीर्तन मालिकेचे जळगाव जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले पुष्प निंभोरा येथे गुंफण्यात आले.
यावेळी बोलताना शामसुंदर महाराज सोन्नर पुढे म्हणाले की, वारकरी संतांनी सामाजिक समतेची वाटचाल सुरू केली. आजही पंढरपूरच्या दिंडी सोहळ्यात सामाजिक समतेचा अविष्कार पहायला मिळतो. स्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच-नीच ही सर्व बंधने झुगारून लोक या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. संत नामदेवांनी सर्व समावेश कीर्तन परंपरा सुरू करून ज्ञान देण्याचा आणि ज्ञान मिळविण्याचा अधिकार सर्वांना असल्याचा संदेश दिला. वारकरी संतांनी स्रीयांना समतेचा अधिकार देत असतानाच त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार मांडलेला आहे.
संत जनाबाई तर-स्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास l अशा शब्दांत स्रीयांना धीर देते, असेही शामसुंदर महाराज म्हणाले जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या उच-नीचते विरोधात वारकरी संतांनी बंडखोरी केलेली आहे. यातायाती धर्म नाही विष्णू दासा अशी साद घालत उचनीचतेला धक्के दिले आहेत. वारकरी संतांनी सुरू केलेली वाट अधिक प्रशस्त करण्याचे काम *साने गुरुजी यांनी केले.
आज सर्वत्र पुन्हा जातीय आणि धर्मांध शक्ती डोके वर काढत आहे. हे थांबवायचे असेल तर वारकरी संतांनी दिलेल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. साने गुरुजी यांच्या उपोषणाच्या स्मृती जागवीत हा कीर्तन महोत्सव आयोजित केल्या बद्दल शामसुंदर महाराज सोन्नर यांनी आयोजकांचे आभार मानले. दर्शना पवार यांनी प्रास्ताविक केले. निभोंरा गावातील उपसरपंच व राजरथ फांऊंडेशन चे अध्यक्ष, सानेगुरुजी स्मारक कार्यकर्ते सुनील पाटील व पायल पाटील यांनी सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले
कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी सलोनी शिंदे, रोहिणी धनगर, उमेश सोनार, आर पी पवार ,किशोर महाजन, राणी पाटील, व निभोंरा गावातील सर्व ग्रामस्थ, शिक्षक मित्रांनी केले.
विशेष सहकार्य-सौजन्य राजरथ फांऊंडेशन