अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील खुल्या भूखंडातील पडलेली झाडे, तोडलेल्या फांद्या, काडी कचरा, रस्त्यावर घाण पडली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे साहित्य त्वरित उचलण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अमळनेर पालिकेचा स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. मात्र शहरातील काही भागात नियमित स्वच्छता केली जाते. काही खुले भूखंड, गार्डनमध्ये सफाई कर्मचारी रोज झाडू मारून स्वच्छता करतात तर काही खुल्या भूखंडात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडून रस्त्यावर फेकल्या आहेत. काही ठिकाणी कचरा रस्त्यावर फेकला आहे. आठ घंटा गाड्या खराब झाल्याने वाॅर्डात कचरा नियमित गोळा केला जात नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साचून तो रस्त्यावर किंवा कुठेतरी मोठ्या जागेत फेकला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही सफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. घरातील कचऱ्याव्यतिरिक्त बाहेरील कचरा उचलला जात नाही. रस्त्यालगतचे गवत काढले जात नाही. डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसाळ्यात आरोग्य खराब होण्याची भिती आहे. नगरपालिकेचे खुले भूखंड तसेच रस्त्यांची सफाई नियमित करण्यात यावी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.