अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यातील भरवस येथील रेल्वेच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. या बोगद्याची दुरुस्ती त्वरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेरहुन गलवाडे, झाडी, भरवस मार्गे शिंदखेडा हा राज्य मार्ग सहा होता. आजही गूगल वर राज्य मार्ग सहा भरवस गावावरून जाणारा दिसतो. मात्र हायब्रीड ऍन्यूटी रस्त्याचे काम सुरू होताच राजकीय प्रभावाखाली हा रस्ता जैतपीर, चौबारी, पाडसे मार्गे वळवण्यात आला. तर या मार्गावरील रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने मोटरसायकलस्वार , लहान वाहने जाण्यास त्रास होतो. पुलाखाली खड्डे पडल्याने अनेकदा मोटरसायकलस्वार पडतात. वाहनचालकांच्या कमरेला त्रास होतो. याबाबत आमदारांकडे तक्रार केली ते म्हणतात माझे काम नाही, खासदार लक्ष देत नाहीत, सार्वजनिक बांधकाम खाते म्हणते की हे रेल्वेचे काम आहे. तर रेल्वे प्रशासन म्हणते हा रस्ताच नाही हा नाला आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून याच रस्त्यावरून आजही वाहतूक सुरू आहे. हाच राज्य मार्ग सहा होता, गूगल मॅप वर देखील नोंद आहे. परंतु प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे या रस्त्याची समस्या न सुटल्यास भरवससह एकतास , एकलहरे गावातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील व यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सरपंच दयाराम भिल, उपसरपंच प्रा. संजय सोनवणे, मंगेश पाटील, बाळू पाटील, सुदाम अवचिते यांनी दिला आहे.