अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगमाला सुरुवात झाल्याने कृषी विभागार्तफे तालुक्यातील नगाव बु. गावात शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक सभा झाली. या वेळी गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना आणि खरीप हंगामासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा झाली. सरपंच सरिता पद्माकर गोसावी अध्यक्षस्थानी होत्या. सभेमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा, सूक्ष्म नियोजन व प्रकल्पातील विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती उप कृषी अधिकारी प्रवीण पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आणि त्यावर उपाययोजना याबाबत त्यांनी उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन केले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी बियाण्यांची योग्य निवड करणे, त्यांची उगवण क्षमता तपासणे आणि बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक पाटील यांनी प्रत्यक्ष करून दाखवले. यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रिया समजून घेतल्या आणि त्या प्रत्यक्ष शेतीत वापरण्याचा निर्धार केला. यानंतर पीएमएफएमई, महाडीबीटी प्रणालीवरील योजनांची माहिती देत असताना पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, प्रक्रिया उद्योगांसाठी मिळणाऱ्या अनुदान योजना, तसेच महिलांसाठी असलेल्या विशेष सवलती यावर भर दिला. तसेच मृग आणि आषाढी महिन्यांत लागवड करता येणाऱ्या फळबाग योजनांची माहिती देऊन जलसंधारण, ठिबक सिंचन व खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. बागायती कापसाच्या खत व्यवस्थापनाचे तांत्रिक व शास्त्रीय मार्गदर्शनही त्यांनी दिले. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, खात्रीशीर व प्रमाणित बियाण्यांची निवड कशी करावी यावरही त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन सहाय्यक कृषी अधिकारी नवल वाघ यांनी केले.
गोपीनाथ मुंडे अपघात योजनची दिली माहिती गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेची माहिती देताना, अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीविषयीही माहिती देण्यात आली. या माहितीमुळे अनेक शेतकरी भावनिक झाले आणि अशा योजनांची माहिती वेळेवर मिळाल्यास त्याचा उपयोग किती महत्त्वाचा ठरतो, हे त्यांनी नमूद केले.