खोटा सातबारा वापरून शेतजमीन खरेदीच्या तक्रारीकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) खोटा सातबारा वापरून शेतजमीन खरेदीची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. याप्रकरणी मिलिंद भिकन पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे तातडीचा तक्रार अर्ज केला आहे.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी मिलिंद भिकन पाटील यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, अमळनेर यांच्याकडे एक तातडीची तक्रार सादर करत गंभीर प्रकरण उजेडात आणले आहे. त्यांनी आरोप केला आहे की कलाबाई परशुराम वैदु यांनी दि. 3 जुलै 2020 रोजी बनावट सातबारा वापरून स्वत:ला शेतकरी दाखवत अशोक भाऊराव पाटील यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली. या प्रकरणाची तक्रार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी व अमळनेर तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. या तक्रारीस आवश्यक पुरावे जोडून दिले गेले असूनही, आज तीन वर्षांनंतरही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी तहसीलदार यांना निर्देश देण्यात आले, तरीदेखील सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांनी असेही सांगितले की, खोटा सातबारा वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने त्यांनी ही तक्रार पुन्हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. पाटील यांनी सांगितले की त्यांनी ही तक्रार सर्व पुराव्यांसह सादर केली असून आता या प्रकरणी तात्काळ आणि कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

 

तक्रारीत मागण्या अश्या

 

बनावट सातबारा वापरणाऱ्या कलाबाई वैदु यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर शेतजमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी. तीन वर्षांपासून दुर्लक्ष करणाऱ्या तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करण्यात यावी. प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सखोल तपासणी करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *