अमळनेर (प्रतिनिधी) सरकारने आयात कर ५ टक्के वरून २० टक्क्याने वाढवल्याने खाद्य तेलाचे भाव १०८ रुपये प्रति किलो वरून १२५ रुपये प्रति किलोवर गेले आहेत. त्यामुळे आगामी सण उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
सरकारने अनेक मोफत योजना आणून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सरकारी तिजोरीची भर काढण्यासाठी आता आयात शुल्कात वाढ केली आहे. सर्व सामान्य ग्राहकाला १०० रुपयात मिळणारे तेल आता सव्वाशे रुपयात मिळू लागले. एव्हढ्या मोठया प्रमाणात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तेलाचे भाव वाढल्याने आता विविध खाद्य पदार्थ, साबण आदी अनेक उत्पादनावर परिणाम होईल. साहजिकच तेलात तळले जाणारे पदार्थ देखील महाग होतील. गणेशोत्सव ,ईद, नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सण आता महागाईमुळे कडू होतील. दिवाळीचा फराळ देखील महाग होईल. तेलामुळे हॉटेलवरचे जेवण महाग होईल. गरिबांना मोफत मिळते त्याची झळ मात्र सामान्य नागरिकांना पडते. श्रीमंतांना किंवा व्यापाऱ्यांना त्याचा काहीच फरक पडणार नाही कारण कराचा बोजा सामान्यांवर टाकला जातो. देशातील विरोधी पक्ष कमजोर असल्याने आम जनता होरपळली जात आहे.