निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मंत्री अनिल पाटील यांना साकडे
अमळनेर (प्रतिनिधी) राज्य परिवहन एस महामंडळातून निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना बारमाही मोफत प्रवास पास देण्यात यावा अशी मागणी एसटीच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले.
एसटीच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एस.टी. महामंडळात निवृत्त कर्मचार्याला सहा महिने करीता मोफत पास सवलत दिली जात आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांनी महामंडळात आपली ३०ते ३५ वर्षे सेवा दिलेली आहे. त्याचा मोबदला हा कमी सवलतीचा दिला जात आहे. महाराष्ट्राच्या विकासात निवृत्त कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांना अल्प प्रमाणात सवलत दिली जात आहे. तरी कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा वाटानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिन्याचा (बारमाही) कायम स्वरुपी मोफत पास मिळावा, व सर्व प्रकारच्या बसेस मध्ये सवलत अनुज्ञेय असावी, मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही सवलत अनुज्ञेय करण्यात यावी. सदर सवलतीचा एस.टी. महामंडळावर काही एक आर्थिक बोजा येणार नाही. व श्रमीकांना १२ महिने मोफत पास दिल्यास आपणा कडुन योग्य तो न्याय श्रमिकांना दिला जाईल.तरी आमच्या मागणीचा सहानुभुती पुर्वक विचार करावा असे आवाहन अमळनेर परिक्षेत्र एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त समुह अधिकारी/कर्मचारी यांनी केले आहे. हे निवेदन देतांना भगवान चिंधू महाजन,सोमनाथ सुंदरलाल वानखेडे, रविंद्र काशीनाथ पाटील, भरत सोनु बोरसे, दिलीप कुळकर्णी, गजानन मराठे, श्यामकांत देशमुख, आधार पाटील, बापू पाटील, किशोर बारी यासह असंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच न्याय मिळवून देण्याची ग्वाही सर्वाना दिली.