कापूस पीक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात एकीकडे राजकीय चिखल होत असतानाच दुसरीकडे सततच्या पावसाने नागरिकांना दहा दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही, त्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतकरी सततच्या पावसाने हैराण झाले आहेत.
गत वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे अमळनेर तालुका हा दुष्काळसदृश्य तालुका म्हणून जाहीर करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक नाड्या बंद पडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले होते. कुटुंबाची उपजीविका कशी भागवायची अशी परीस्थिती पाऊस नसल्यामुळे निर्माण झाली होती. परंतू यंदा मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने मृग नक्षत्रातच पेरणी उरकली. परंतू तेंव्हा पासून सतत पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पिकात वाफ होत नसल्यामुळे शेतात पिकांच्या बरोबरीने तण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.तसेच पिक खुरपणीसाठी देखील पाऊस वेळ देत नसल्यामुळे आज ही शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असल्यामुळे सततच्या पावसाने तणनाशक व खुरपणीसाठी पाऊस थांबत नसल्यामुळे पिके माञ धोक्यात आली आहेत.
तालुक्यात पिकांची वाढ जोमात झाली आहे. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे सर्वत्र पिके पिवळी पडत आहेत. पिकामध्ये पावसाचे पाणी साचून आहे. शेतात सततचा पाऊस कसलीच उघडीप देत नाही आहे. त्यामुळे पिकांमध्ये आंतर मशागत व फवारणी करता येत नाही. अशी परीस्थिती तालुक्यात सर्वच भागात निर्माण झाली आहे.
सतत पाऊस पडत असल्यामुळे पिके धोक्यात
गतवर्षी पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. तर यंदा पाऊस सतत पडत असल्यामुळे पिके धोक्यात आहेत. यंदा सतत पडणाऱ्या पावसाने पाणी साचले असून पिके पिवळी पडून वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पिकाच्या बरोबरीने तण देखील वाढले आहे.
राजेश वाघ, शेतकरी,डांगर बुद्रुक