तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात संगणकीय प्रणालीचे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरतर्फे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाद्वारे ग्राहक/वयोवृद्ध नागरिक, महिला ,विद्यार्थी यांच्यासाठी अनेक प्रकारच्या विविध सुविधा व योजना लागू केलेल्या आहेत. सदर योजनेचे लाभ मिळणे कामी लाभार्थींना आवश्यक असणारी कागदपत्रे व माहितीसाठी सेतू सुविधा केंद्र या माध्यमाच्या वापर करून शासनाकडे माहिती पुरवावी लागते. लाभार्थींची प्रचंड गर्दी विचारात घेता सद्यस्थितीत असलेले सुविधा केंद्राची संख्या अत्यल्प असल्याने ,महिला, वयोवृद्ध नागरिक व विद्यार्थी यांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येत आहे. शासनाने याची दखल घेऊन सुविधा केंद्रांची संख्या त्वरित वाढवावी व लाभार्थ्यांची गैरसोय त्यामुळे कमी होऊन शासकीय योजना पासून वंचित राहू नये याकरिता सुविधा केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी मान. तहसीलदार साहेब यांच्याशी ग्राहकांच्या शासकीय समस्यांबाबत व तक्रारीं बाबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली.या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष स्मिता चंद्रात्रे, जिल्हा सहसंघटक मकसूदभाई बोहरी, महिला प्रांत प्रमुख ऍड. भारती अग्रवाल, जिल्हा सायबर प्रमुख विजय शुक्ल , जिल्हा ऊर्जा प्रमुख सुनील वाघ, तालुका संघटक सौ ज्योती भावसार, सदस्य महेश पाटील तसेच पुरवठा अधिकारी संतोष बावणे,मेहराज बोहरी उपस्थित होते.