खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंत्री महोदय आणि त्यांच्या समर्थकांच्या वाढलेल्या अहंकाराचे उत्तर जनता देईलच

माजी आमदार शिरीष चौधरी गटाचे गट नेते प्रविण पाठक यांनी दिले सडेतोड उत्तर

 

अमळनेर (प्रतिनिधी) काही व्यक्तींना त्यांच्या पात्रतेपेक्षा मोठे पद मिळाल्यावर त्यांच्यात अहंकार येत असतो. सध्या मंत्री महोदय आणि त्यांच्या समर्थकांचा अहंकार चांगलाच वाढला आहे. मुळात लोकांमध्ये प्रचंड चिड आहे. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत इथली जनता लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला देईलच हे ही लक्षात असुद्या असे सडेतोड उत्तर माजी आमदार शिरीष चौधरी गटाचे गट नेते प्रविण पाठक यांनी देऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केलेल्या विधानाचा माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या समर्थकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रविण (बबली) पाठक यांनी माजी आमदार शिरिष चौधरी यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेबाबत बोलताना म्हटले की,  सध्या मंत्री महोदय आणि त्यांच्या समर्थकांचा अहंकार वाढला आहे. अमळनेरच्या जनतेत त्यांच्या कार्यप्रणालीबाबत असलेला असंतोष त्यांना आता दिसू लागला आहे. अशात लोकांची कामं करण्याऐवजी दुसऱ्यांवर टीका करण्यात अजित पवार गटाचे पदाधिकारी धन्यता मानत आहेत. माजी आमदार शिरीषदादांवर टीका करण्याची पात्रता आपली आहे का हे त्यांनी स्वतः तपासून पहावे. अमळनेरच्या जनतेने माजी आमदार शिरीषदादांना कधीही परका समजले नाही. इथल्या गरीब, कष्टकरी जनतेने त्यांना या मतदारसंघाचे आमदार बनवले आहे. मागील निवडणुकीतही इथल्या लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. म्हणून त्यांचंही तेवढंच प्रेम इथल्या लोकांवर आहे. सध्या कोणतंही पद नसतानाही त्यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी येणारा निधी हेच त्याचं प्रतिक आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे या मतदारसंघात मार्गी लावली व आताही त्यांनी अमळनेर शहरात प्रयत्नामुळे सुमारे ३ कोटीचे सौर पथदिवे मंजुर करुन शहरात लावले आहेत. आताही शहरात ५.५० कोटीचे सिमेंट काँक्रिटचे रस्त्यांचे काम चालु आहे. यासाठी त्यांनी आपली राजकीय ताकद वापरत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चांगल्या राजकीय संबंधांमुळे मतदार संघात निधी खेचुन आणला आहे. सदर कामांचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. अजुनही बरीचशी कामे जिल्ह्याचे नेते मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून प्रस्तावित आहेत. त्यामुळे आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पाठक यांनी भागवत पाटील यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याने आता हे वाकयुद्ध कशाप्रकारे रंगणार, अजित पवार गटाचे पदाधिकारी पाठकांच्या या प्रश्नांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मंत्री महोदय एवढेच सक्षम आहेत तर ही उत्तरे द्या…

 

मंत्री महोदय एवढेच सक्षम आहेत तर अधिवेशनात जिल्ह्यातील इतर प्रकल्पांना निधी मिळत असताना पाडळसरे धरणासाठी निधी का आणू शकले नाहीत? तुमचे नेते स्वतःकडे मदत व पुनर्वसन मंत्रालय असूनही मागील वर्षात आपल्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या तालुक्याला दुष्काळग्रस्थ जाहीर करू शकले नाहीत. इथल्या शेतकऱ्यांना पिकविम्याची ७५ टक्के रक्कम मिळू शकली नाही. तुमच्या नेत्याने याचा पाठपुरावा केला का? २०२१ मधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचं काय झालं? मागील वर्षीच्या गारपीटमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची भरपाई काय केली? असे अनेक प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकले नाही, तर मग तुम्ही नेमके सक्षम कशात आहात? याचं उत्तर संबंधित पदाधिकाऱ्यांनी द्यावं. मुळात लोकांमध्ये याबद्दल प्रचंड चिड आहे. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत इथली जनता लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला देईलच हे ही लक्षात असुद्या.”

असा इशाराही दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button