अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा व पिंगळवाडे परिसरात महिन्याभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन्ही गावातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तरीही वन विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने बिबट्याकडून नरबळीची प्रतीक्षा वनविभाग करीत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या १५ दिवसात पिंगळवाडे येथील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गाई व वासरावर हल्ला केला त्यानंतर काल दिनांक ११ जुलै रोजी निंभोरा येथे गाईच्या गोठात शिरून बिबट्याने वासराचा जीव घेतला व गाईवर देखील हल्ला केला, तालुक्यातील वन विभागाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर देखील त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. याउलट जोपर्यंत बिबट्याकडून एखाद्या माणसावर हल्ला होत नाही तोपर्यंत वनविभाग कुठलीही कारवाई करू शकत नाही असे अजब उत्तर देण्यात आले. मदत व पुनर्वसन मंत्री असलेल्या तालुक्यात नागरिकांना मात्र मदतीसाठी मानवी जीवावर हल्ला होईपर्यंत वाट पाहण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सदर कार्यभाराचा नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.