अमळनेर (प्रतिनिधी) वाळू चोरट्यांची मुजोरी वाढली असून त्यांनी एकाच्या डोक्यात पावडी मारून रक्तभंबाळ केल्याची घटना ४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कन्हेरे येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रमोद चव्हाण हा श्रावण मोतीलाल पारधी यांच्यासोबत ४ रोजी कन्हेरे येथे बोरी नदीतून जात असताना सुरेश मुकुंदा गोलाईत हा नदीतून पॅजो रिक्षामध्ये वाळू भरत होता. त्याला प्रमोद चव्हाण याने वाळू भरू नको म्हणून सांगितले असता सुरेश याला राग आला आणि त्यांनी नदी तुझ्या बापाची आहे का असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. आणि त्याचा भाऊ सागर गोलाईत याला फोन लावून बोलावून घेतले. सागर देखील आल्याआल्या शिवीगाळ करू लागला. तेव्हढ्यात सुरेश याने पावडीच्या लाकडी दांडक्याने डोक्यात मारल्याने प्रमोद जखमी झाला. डोक्यातून रक्त वाहू लागल्याने त्याला उपचारासाठी ग्रामिण रुग्णलयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला चार टाके पडले. त्याला चक्कर येत असल्याने त्याने उशिरा फिर्याद दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला दोघा भावाविरुद्ध भादवि ३२४,३२३ ,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.