वनविभागाने वन्यप्राणी गणनेसाठी उभारले मचाण
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर वनक्षेत्रातील पाणवठयावर बुद्ध पौर्णिमेच्या वन्यप्राणी गणनेसाठी वनविभागाकडून तयारी करण्यात आली आहे. या वन्यप्राणी गणनेसाठी मचाण उभारले आहे.
अमळनेर तालुक्यात पारोळा वनक्षेत्रांतर्गत हजारो हेक्टर वनक्षेत्र असून त्यामध्ये हरण,काळवीट, नीलगाय, रानडुकरे, मोर, लांडोर, ससे, कोल्हे, माकड, रान मांजर, उदमांजर, इत्यादी वन्यप्राण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणी गणनेच्या विविध पद्धती असून त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. तसेच ट्रॅप कॅमेराद्वारेही गणना होते. मात्र नवखे निसर्गप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी, यांना संपूर्ण रात्र वनक्षेत्रात काढून त्याचा थरारक अनुभव लुटता यावा. त्यासोबतच दर्शन देणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना करता यावी. म्हणून या वनक्षेत्रात 23 रोजी बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाकडून तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी अशद सिराज मुलानी यांनी दिली. जानवे, डांगर, कोंढावळ,रामेश्वर, हेडावे, खेडीव्यवहारदळे,जुनोने, या गावांना लागून असलेल्या वन क्षेत्रात अनेक दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास आहे. या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था आणि अन्नसाखळी चांगली असल्याने येथे दरवर्षी प्राण्यांच्या संख्येत झाल्याचे दिसून आले आहे. वनक्षेत्रात वन विभागाने पाणवठयाची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुद्ध पाणीपुरवठा करणे, नवीन मचानांची पाणवठयाच्या शेजारी उभारणी करणे.आधी कामे पूर्ण केलेली आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांच्या गणनेसाठी अनेक ठिकाणी मचाण बांधण्यात आल्या आहेत. वन्यप्राणी गणनेसाठी शहरी भागातील अनेक निसर्गप्रेमी वन क्षेत्रात येत असतात. त्यासाठी रात्री वन्य प्राण्यांचे दर्शन व्हावे.यासाठी वनविभागातर्फे व्यवस्था केली आहे.