अमळनेर (प्रतिनिधी) लग्नकार्य ठरतात मुहूर्ताच्या महिनाभर आधीच नातेवाईक, मित्रमंडळींना लग्न पत्रिका वाटप करण्याचे काम पूर्वी सुरू होत असे. अलीकडच्या काळात मात्र छापील लग्न पत्रिका वाटपाकडे कल कमी झाला असून, सोशल माध्यमांवर डिजिटल लग्नपत्रिका पाठवण्याकडे कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झालेला आहे. सध्या सोशल माध्यमातून डिजिटल लग्नपत्रिका पाठवल्या जात आहेत. पूर्वी लग्न सोहळे आठ -आठ दिवस चालायचे. अलीकडच्या काळात मात्र काही तासातचं लग्न उरकले जात आहेत. आधुनिक काळात अनेक गोष्टी आता चुटकी सरशी काही वेळातच होत आहेत. लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्नपत्रिका वाटपासाठी घरोघरी जाण्यापेक्षा अनेक जण सोशल मीडियाचा आधार घेऊ लागले आहेत. आता लग्नपत्रिकेचे स्वरूपही बदलले असून नाते व मित्र परिवाराला विवाह सोहळ्याचे व आग्रहाचे आमंत्रण देण्यासाठी गावोगावी, घरोघरी जाऊन निमंत्रण देण्याची प्रथा कालबाह्य होत चालली आहे. ही निमंत्रण पत्रिका व्हाट्सअप,फेसबुक, ई-मेल, इंस्टाग्राम, आदी सोशल माध्यमांच्या आधारे दिल्या जात आहेत. दृकश्राव्य व डिजिटल छायाचित्रांद्वारे संदेश पाठवले जात आहेत. लग्नपत्रिका बनवणाऱ्या प्रिंटिंग,ऑफसेट व्यवसायिकांचेही काम कमी झालेले आहेत. पूर्वी बाहेरगावी असलेल्या नातेवाईक व जवळील व्यक्तींना लग्नपत्रिका देण्यासाठी खास दौरा काढला जात होता. त्यांच्या हातात लग्नपत्रिका व लग्नाला येण्यासाठी प्रवासभाडे देण्याची म्हणजे मूळ पत्रिका लावण्याची जुनी परंपरा असलेली पद्धत होती. आता मात्र एवढा वेळ कोणाकडेही उरलेला नसून तेवढा जिव्हाळा ही आता कुणी जपत नाही. बाहेरगावी राहणाऱ्यांना डिजिटल लग्न पत्रिका सोशल मीडियावर टाकली जात आहे. त्यातच आग्रहाचे निमंत्रणाचा संदेश टाकून व नंतर प्रत्यक्ष फोन करून लग्नाचे आमंत्रण दिले जात आहे. अशाप्रकारे सोशल मीडियाद्वारे लग्नपत्रिका पाठविल्या जात असल्यामुळे जाणे-येण्याचा खर्चही कमी झालेला आहे. तसेच या धकाधकीच्या जीवनात वेळेची देखील बचत होत आहे. या सोशल मीडियामुळे जिव्हाळा, आपुलकी कमी झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पोस्टद्वारेही लग्न पत्रिका पाठवली जायची, परंतु आता पोस्टाद्वारे लग्नपत्रिका पाठविणे कमी झाले आहे. यामुळे जुन्या रूढी परंपरा व प्रथा काही प्रमाणात आता बंद होत चालल्या आहेत.
छापील लग्नपत्रिकांना आजही महत्त्व
भारतीय पद्धतीनुसार विवाहाचे आमंत्रण देताना छापील लग्नपत्रिकांना महत्त्व आहे. त्यामुळे मित्रपरिवार डिजिटल आमंत्रण दिले तरी नातेवाईकांना मात्र पत्रिकेच्या माध्यमातून आमंत्रण दिले जाते. साध्या पोस्टाने 50 ग्रॅम पर्यंत 4 रुपये रुपये व स्पीड पोस्टाने 50 ग्रॅम पर्यंत 41 रुपये दर आहेत.
ए. आर.साळुंखे, पोस्टमास्टर, पोस्ट ऑफिस, अमळनेर