स्वागत कमानींवर इंग्रजी शाळांच्या जाहिराती करून मराठीची गळचेपी
अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय साहित्य संमेलन हे घरचा खासगी कार्यक्रम समजून त्याची आखणी, नियोजन आणि जाहिराती करून होत असल्याचे दिसून येत आहे. साहित्य संमेलन मराठी असून इंग्रजी शाळांच्या जाहिराती म्हणजे चक्क मराठीची गळचेपीच असल्याचा आरोप बुद्धीजीवींकडून केला जात असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मराठी वाड्मय मंडळाचे की खाजगी धंदेवाईकांचे ? असा खडा सवाल माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांनी उपस्थित करून हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे हे संमेलन सुरुवातीला लोगोपासून ते समारोपापर्यंत वादावादीतच असेल असे दिसत आहे.
अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. याचे यजमानपद अमळनेर येथील मराठी वाङमय मंडळाने स्वीकारले. या मंडळाने सुरुवातीपासून हे संमेलन घराच्या कार्यक्रमासारखे करून टाकले आहे. आपल्या मनाप्रमाणे लोगो तयार करू पुज्य सानेगुरूजी यांना डावलण्यात आले. संपूर्ण राज्यभर या लोगोवर पण टिका झाली. तरीही मंडळ टच से मच झाले नाही, आपलीच रिघ ओढत अजून या लोकांचे नियोजन सुरू आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनासाठी शहराच्या बाहेरील प्रमुख रस्त्यांवर व संमेलन परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वागत कमानी आयोजकांतर्फे लावण्यात येत आहेत. या कमानींवर साहित्य संमेलनाची माहिती व थोर पुरुषांचे छायाचित्रांसह इंग्रजी माध्यम शाळेची व सुपर मार्केटची व्यावसायिक जाहिरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलनाची स्वागत कमान नसून एखाद्या व्यावसायिक प्रदर्शनाची स्वागत कमान आहे असे ठळकपणे दिसून येत असल्याने राज्यभरातून येणाऱ्या साहित्यिकांमध्ये अमळनेरची इभ्रत काढली जाणार आहे. संमेलनासाठी कोट्यावधीचा निधी मिळूनही खासगी जाहिराती घेतल्याच का, असा सवाल उभा राहत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत कमानीवर इंग्रजी माध्यमाच्या जाहिरातीने चक्क प्रवेशासाठीच जाहिरात यातून करून घेतली आहे. विशेष म्हणजे या स्वागत कमानी बद्दलचे पडसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर उमटू लागले आहेत.
समित्यांमधील पदेही एकाच घरात
या साहित्य संमेलनाच्या समितीमध्ये महाव्यवस्था प्रमुख व कोषाध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच घरातील दोन व्यक्तींना देण्यात आल्यामुळे साहित्यकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याबद्दलही शहरात उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमांना मंचावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार असून बारा राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिल्याचे पत्रिकेतून स्पष्ट होत आहे. तसेच संमेलनातील दोन परिसंवाद राजकीय असून यामध्ये मात्र एकाही राजकीय नेत्याचा वा व त्याचा सहभाग दिसत नाही हे प्रकर्षणाने जाणवते. एवढेच नव्हे तर परिसंवादाचे काही विषयी ही राजकीय अंगाने जात असल्याने साहित्यिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
बापाचा पैसा समजून नगरपालिकेची उधळपट्टी
ऐरवी शहरात अनेक समस्या असताना त्या सोडवण्याकडे नगरपालिका निधी नसल्याची बोंब मारते आणि आता साहित्य संमेलनासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. कर भरूनही नागरिक समस्या घेऊन गेल्यावर त्यांची कामे होत नाही. तर आता साहित्य संमेलासाठी ऐवढा जोर नगरपालिकेला कसा आला, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे. आपल्या बापाचा पैसा समजून तो साहित्य संमेलनाच्या कामावर उधळला जात आहे. त्यामुळे आगामी काळात कोणताही कर न भरण्याची भूमिका नागरिक घेण्याच्या मनस्थितीत आहे.
आयोजक पडणार तोंडघासी
या साहित्य संमेलनाबरोबच शहरात विद्रोही साहित्य संमेलन त्याच दिवशी होत आहे. त्यामुळे या संमेलनातून विद्रोहाची क्रांती होत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य, नागरिक हे तोंडघासी पाडतील, असे चित्र सध्या शहरात दिसत आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा साहित्य संमेलनावर करण्यात येणारा चुराडा वाया जाणार आहे, सभा मंडपे मोठे आणि उपस्थित नगण्य असेल तर आयोजकांची नाचक्की निश्चितच होणार आहे.
जागा देणाऱ्या खाशीची जाहिरात संयुक्त झाली नसती काय?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मराठी वाड्मय मंडळाचे की खाजगी धंदेवाईकांचे ? यापेक्षा ज्या खा.शि.मंडळाने आपली जागा देऊ केली आहे, त्यांची जाहिरात संयुक्तिक झाली नसती काय ?
डॉ. बी एस पाटील, माजी आमदार अमळनेर
काही स्वागत कमानींना प्रायोजक
सर्व प्रमुख स्वागत कमानींचा खर्च मराठी वाङमय मंडळ करणार असून काही स्वागत कमानींना प्रायोजक आहेत. किती स्वागत कमानींना प्रायोजक आहेत. याची संपूर्ण माहिती घेऊन आपणास कळवितो.
डॉ. अविनाश जोशी,आयोजक तथा कार्याध्यक्ष, मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर