अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथील अतिरिक्त पदभार असलेल्या ग्रामसेवकांचा कार्यभार काढून तात्काळ नियमित, पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा. तसेच ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर जमा करून ग्रामसेवक व ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची निष्पक्षपाती चौकशी व्हावी, या मागणीसाठी तहसील व पंचायसमितीच्या आवारात उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने गावातील ग्रामपंचायतच्या प्रशासनाला जाग यावी, अकार्यक्षम, अनियमित, अतिरिक्त चार्ज दिलेले ग्रामसेवक सुकलाल मालचे यांचा कार्यभार तात्काळ काढून कायमस्वरूपी पूर्ण वेळ, नियमित ग्रामसेवक तात्काळ द्यावा ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय यापूर्वीच दिलेल्या निवेदनाप्रमाणे आर्थिक गैरव्यवहार, प्रशासनिक अनागोंदी, सरपंचांनी केलेला एकाधिकार व हुकूमशाही केलेला एकतर्फी गैरकारभार, गायरान जमिनीवरील वृक्षतोड करून रकमेचा केलेला आर्थिक अपहार, अतिक्रमण, आपात्रता प्रकरण, ग्रामपंचायत विरुद्ध केलेला न्यायालयीन दावा या संदर्भात देखील मागण्या असून त्या जबाबदार अधिकारी वर्गाकडून त्यांची दखल घेऊन सखोल चौकशी व्हावी. विविध सभांच्या प्रोसिडिंगमध्ये अनियमितता, फेरफार, खोट्या सह्या,बनावट इतिवृत्त, पंधरावा वित्त आयोगाच्या सर्व विकास कामांच्या चौकशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन आदी मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठीच या मार्गाचा अवलंब केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला आम्ही दीड वर्षापासून तोंडी व लेखी विनंती केल्या. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष, इन कॅमेरा, पारदर्शक, सर्व ग्रामस्थांना बोलावून चौकशी व्हावी. गावाच्या आरोग्य व पाणी प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. गावाची सार्वजनिक अस्वछता, अशुद्ध पाणी, अनियमित पाणीपुरवठा, शौचालय-मुताऱ्या दुर्गंधी व रोगाचे माहेरघर झाले आहेत. याची दखल घ्यावी, अशी मागणी केली. उपोषणाला ग्रामपंचायत सदस्य निंबा लोटन पाटील व कलाबाई वसंतराव पाटील बसले असून त्यांनी मागण्या केल्या तर त्याकरिता गावातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सक्रिय पाठींबा देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. याप्रसंगी शशिकांत पाटील, स्वानंद सयाईस, राहुल दामोदर पाटील, संजय पाटील, वसंतराव पाटील, दिनेश सुभाष पाटील, नितीन अभिमन पाटील, व्यंकट बापूजी, किरण सुभाष पाटील, मयूर पाटील, प्रविण बच्छाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रश्नी मा तहसीलदार सुराणा साहेब यांनी उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर चौकशी होईल आणि नवीन ग्रामसेवक देण्यात येईल असे आश्वस्त केले. त्यात समिती येथील विस्ताराधिकारी काठोरे साहेब यांनी स्वतः गटविकाॉस अधिकारी सखोल चौकशी करून कार्यवाही करतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.